covid लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
covid लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

वैद्यकीय कचर्‍याची समस्या आणि उपाय / Biomedical Waste: Problems and Solutions

शाश्वत विकासाच्या संदर्भात भारताचा क्रमांक १६५ राष्ट्रांमध्ये १२० वा लागतो. कचरा प्रक्रियेबाबत उदासिनता हे याचे एक महत्वाचे कारण. त्यात गेल्या काही वर्षात कोविड महामारीने 'दुष्काळात तेरावा महिना' असे म्हणायला हवे. वैद्यकीय सेवांमधून निर्माण होणारा कचर्‍यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि या धोकादायक कचर्‍याची विल्हेवाट हा एक अतिमहत्वाचा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात संशोधकांनी या गंभीर बाबीचा आढावा घेतला आहे त्याचा हा गोषवारा.

वैद्यकीय कचरा विविध वैद्यकीय सेवांमधून निर्माण होतो. मानव तसेच प्राण्यांच्या स्वास्थ्यासाठी दिलेल्या निदान, उपचार आणि लसीकरण तसेच जैविक संशोधन आणि विकास या त्या वैद्यकीय सेवा. यातून निर्माण होणारा ८५% कचरा हा कमी जोखमीचा असला तरी उरलेल्या कचर्‍यातील सुमारे १०% कचर्‍यातून संसर्गजन्य रोगांचा फैलाव होण्याची आणि सुमारे ५% कचरा किरणोत्सर्गी किंवा रासायनिक असल्याने तो अतिधोकादायक ठरतो. त्यामुळे ४० लाख मुलांसकट सुमारे ५२ लाख लोक मृत्यू पावतात असे जागतिक आरोग्य संस्थेचे अनुमान आहे. भारतात दररोज सुमारे ७७५ टन वैद्यकीय कचरा निर्माण होतो आणि यात सरासरी ७% वार्षिक वाढ नोंदलेली आहे. सुमारे ३००० इस्पितळे, ३,२२,००० इतर आरोग्य सेवा सुविधा केंद्रे, २१००० अलगीकरण कक्ष, १५०० नमुना चाचणी केंद्र आणि २६४ प्रयोगशाळांतून कोविड महामारी दरम्यान दररोज १०१ टन वैद्यकीय कचर्‍याने यात मोठीच भर घातली आणि कचर्‍याच्या विल्हेवाटीची समस्या आणखीच गंभीर केली आहे. १० मे २०२१ रोजी तर २५० टनाइतकी नोंद झाली. आरोग्य सेवा केंद्रांपैकी सुमारे १३% केंद्रांनी वैद्यकीय कचर्‍याच्या विल्हेवाटीची नियमावली पाळली नाही असे नजरेस आलेले आहे. दररोज सुमारे ७४ टन कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता खोल खड्ड्यात ढकलला जातो. कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय कचर्‍याची योग्य तर्‍हेने विल्हेवाट न लावल्यामुळे कोरोनाच्या नव्या जातीतील विषाणूंना आणि इतर संसर्गजन्यरोगांना जन्म देण्याची भीती व्यक्त केली जाते. 

आकृती: वैद्यकीय कचर्‍याच्या धोक्यानुसार
 त्याचे करावयाचे वर्गीकरण
वैद्यकीय कचर्‍याच्या धोक्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. तो वेगवेगळ्या डब्यात साठवला जातो. त्या डब्यांना रंगांचे संकेत दिले आहेत. जसे शरीराचे भाग, रासायनिक आणि घाणेरडा कचरा, केमोथेरपीचा कचरा, औषधी उत्पादने आणि प्रयोगशाळेतील कचरा यांची विल्हेवाट लावण्याकरता पिवळ्या डब्यांचा वापर केला जातो. लाल डबा दूषित प्लास्टिक कचऱ्यासाठी, निळा डबा काच आणि रोपणासाठी वापरलेल्या धातूच्या कचर्‍यासाठी, पांढरा डबा धातूच्या धार-दार वस्तूंसाठी, काळा डबा इतर घातक कचऱ्यासाठी तर हिरवा डबा विघटन होणार्‍या साध्या कचऱ्यासाठी वापरला जावा असे संकेत आहेत.

गोव्याच्या शेजारच्या राज्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावायची सोय केलेली आहे असे संशोधक म्हणतात. पण गोव्यातही हल्लीच पिवळा, लाल, निळ्या आणि पांढर्‍या डब्यातला कचरा हाताळायची सोय झालेली दिसतेय. कुंडई औद्योगिक वसाहतीत बायोटिक वेस्ट सोल्युशन्स प्रा.लि. नावाच्या कंपनीला ही जबाबदारी दिली असल्याचे इतर संकेतस्थळे शोधल्यावर कळते. जगातल्या सर्वोत्कृष्ट भट्टीचा उपयोग ते कचरा जाळण्यासाठी करतात असा त्यांच्या संकेतस्थळावर दावा आहे. 

कोविडमुळे वैद्यकीय कचर्‍यात अचानक झालेली वाढ आणि त्याची विल्हेवाट लावणे ही नागरिकांना लस देण्याइतकेच बिकट काम होते. दिलेल्या प्रत्येक इंजेक्शनची सिरिंज, १०-२० जणांना लस दिल्यानंतर (किंवा वाया गेलेल्या) लसीच्या काचेच्या बाटल्या रिकाम्या होऊन कचर्‍यात भर पडते. मुखावरणे (मास्क), चेहरा झाकणारी कवचे, हातमोजे, पोशाख (पीपीई किट्स) यांची भरही वैद्यकीय कचर्‍यात पडतच असते. अनेकदा ते आजूबाजूच्या कचर्‍यातही आढळतात. या वस्तूंना पुन:प्रक्रियेला पाठवण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक ठरते आणि यासंबंधी संबंधित घटकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. 

महामारीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याला तोंड देण्यासाठी करायच्या काही उपाययोजना खालीलप्रमाणे नमूद केल्या आहेत:

  • मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा ज्या राज्यांमध्ये निर्माण होतोय तेथे घातक कचरा जाळण्याचे संयंत्र, औद्योगिक स्तरावर बंदिस्त ठिकाणी कचरा जाळण्याची सोय करणे यासारख्या वैकल्पिक व्यवस्था निर्माण करण्यावर भर
  • रुग्णालयाबाहेरील लसीकरण शिबिरांमध्ये निर्माण होणारा कचर्‍याचे योग्य प्रकारे विलगीकरण
  • जैव-वैद्यकीय कचऱ्याच्या संकलनादरम्यान बार-कोडिंगची योग्य अंमलबजावणी करणे, ज्यायोगे कचऱ्याच्या स्त्रोताचा सुनिश्चित मागोवा घेता येणे शक्य होईल
  • कचरा निर्मितीच्या ठिकाणीच त्याचे त्याच्या स्तरानुसार योग्य असे अलगीकरण करण्याकरता जागरुकता निर्माण करणे
  • कचरा निर्मितीच्या ठिकाणांची मध्यवर्ती केंद्रावर व्यवस्थित नोंद ठेवणे
  • कचरा निर्मिती केंद्र, संस्करण केंद्र, निवडक कचरा जाळणार्‍या भट्ट्या यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अविरत नोंद ठेवण्याची सोय
  • राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांद्वारे तळागाळात आरोग्य सेवा कर्मचार्‍यांसाठी आणि राज्य मंडळाच्या अधिकार्‍यांसाठी व्यापक प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे
  • यासंबंधीच्या नियमांचे पालन न करणार्‍या आरोग्य सुविधांविरुद्ध नियामक प्राधिकरणांकडून कठोरपणे पर्यावरण नुकसान भरपाई शुल्क वसूल करणे

आकृती सौजन्य: बायोटिक वेस्ट सोल्यूशन्स प्रा.लि. कुंडई

संदर्भ:‌ Saxena, P. Redefining bio-medical waste management during COVID-19 in India: A way forward. Mater Today Proc. 2022; 60: 849–858. doi: 10.1016/j.matpr.2021.09.507

----------------------------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या ३१ ऑगस्ट २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.





शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

कोविडच्या लसींना पर्याय / Alternative to COVID vaccine

कोविड-१९ ची पहिली लाट आली त्याला आता येत्या जानेवारीत तीन वर्ष होतील. आपण भारतीय इतरांपेक्षा नशीबवानच म्हणायला हवे. याकरता लागणार्‍या लसींची निर्मिती भारतात झाली, सरकारने ती सगळ्यांना मोफत द्यायला सुरुवात केली. दोनशे कोटी लसींचा आकडा आपण पार केला आहे. त्यामुळे त्याची लागण तशी आटोक्यात आहे. पण तरीही या दरम्यान एका मागोमाग लाटा येत गेल्या आणि धोका कमी झालेला असला तरी संपला नाहीये. अजूनही सुरक्षित अंतर पाळा, मुखपट्टी वापरा, हात वारंवार धुवा हे सांगितले जातेच. हा विषाणूही तसा चिवटच, जाता जात नाहीये. त्याच्या नवनव्या उपजाती निघताहेत आणि कधी कोणाला त्या ग्रस्त करतील याची खात्री देता येत नाहीये. घेतलेल्या लसींचा या नव्या उपजातींवर परिणाम कितपत होईल अशी शंका सतत मनाला सतावत राहते. कारण विषाणूंच्या नव्या उपजातींचीही लसींना तोंड द्यायची शक्ती वाढत आहे. मग वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेण्याचा आग्रह केला जातोय. ही साखळी कधी तुटणार आणि त्यातून सामान्य व्यवहार कधी सुरु होणार याची कल्पना कोणालाच नाहीये. फरक इतकाच की त्याला तोंड द्यायची मानसिक शक्ती वाढली आहे. कारण घरात किती दिवस बसून राहाणार? 'वाघ म्हटले तरी खातो, वाघोबा म्हटले तरी खातोच' अशी एक म्हण मराठीत आहे. तशी परिस्थिती आहे.

रेखाचित्र :‌ भिंगाखाली पेप्टाइडनी कोविडच्या विषाणूंना (व्हायरसचे कण)
एकत्र गुंफलेले दिसत आहे 

या लसी कसे कार्य करतात हे समजून घेणे आवश्यक ठरते. एकदा का कोविडचा विषाणू आपल्या पेशीत शिरला की या लसींमुळे निर्माण झालेले प्रतिपिंड (अँटीबॉडीज) कार्यरत होतात आणि विषाणूला ग्रासून टाकत त्याला पेशींच्या केंद्रकापर्यंत पोहोचायला मज्जाव करतात. पण वर म्हणल्याप्रमाणे विषाणूच्या सुधारित उपजातींना अशी प्रतिपिंड कितपत मज्जाव करतील याची शंका उरते. म्हणून अशा विषाणूंच्या निर्मूलनासाठी आता वेगळ्या दिशेने त्यांचा अटकाव करण्याच्या अभिनव पद्धती शोधून काढण्याचे प्रयत्न होत आहेत. अशाच एका प्राथमिक स्तरावर सफल झालेल्या प्रयत्नाची ही झलक. सीएसआयआरच्या चंदीगड येथील सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने बंगळूरुच्या भारतीय विज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांनी यासंबंधी केलेले प्राथमिक स्तरावरील प्रयोग नव्या आशा उत्पन्न करणारे आहेत.

दोन प्रथिने जवळ आली की त्यांच्यात परस्परसंवाद निर्माण होतो आणि ती कुलूप-किल्लीसारखी एकत्र येतात. हेच तर कोविड विषाणू आपल्या पेशीत शिरला की होते. मग हा संवादच टाळता आला तर? हा विचार मनात ठेऊन या वैज्ञानिकांनी याकरता कृत्रिम पेप्टाइडची निर्मिती करुन त्याचा उपयोग करायचे ठरवले. परस्परसंवादाला कृत्रिम पेप्टाइड्सद्वारे अडथळा आणला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने त्यांनी प्रयोग करायला सुरुवात केली. पेप्टाइड म्हणजे अमिनो आम्लांची एक साखळीच असते. अगदी दोन अमिनो आम्ल एकत्र येऊन पेप्टाइड तयार होते, तर प्रथिने अशा अनेक पेप्टाइड एकत्र येऊन लांबलचक अशा अमिनो आम्लांच्या साखळीने बनतात म्हणून त्यांना पॉलीपेप्टाइडही म्हणले जाते. आपले शरीर अशा अनेक पेप्टाइड्सनी बनलेले असते. असे पेप्टाइड्स प्रयोगशाळेतही तयार करता येतात. प्रयोगशाळेत तयार केलेले पेप्टाइड्स आपल्या शरीरातल्या पेप्टाइड्सची नक्कल करू शकतात. म्हणून त्याचा वापर औषधांमध्येही केला जातो. अगदी मधुमेहापासून ते बहुविध चेतादृढन व्याधींसाठी (मल्टिपल स्क्लेरोसिस) त्यांचा वापर होतो. शिवाय यांचा वापर सौंदर्यप्रसाधनांसाठी लागणार्‍या क्रीम्स आणि लोशनमध्येही केला जातो. आहाराला पूरक म्हणूनही गोळ्या आणि द्रव स्वरुपातही त्यांचा वापर होतो. अशा कृत्रिम पेप्टाइड्स वापरुन दोन प्रथिनांमधील संवादाला अटकाव निर्माण करता येतो. हेच गृहीत या प्रयोगादरम्यान वापरले गेले. पेप्टाइड्समध्ये कोविडसारख्या विषाणूंना (व्हायरसचे कण) एकत्र गुंफण्याची क्षमता असते, त्यामुळे पेशींना संक्रमित करण्याची त्यांची क्षमता कमी होते. अशा रितीने कोविड विषाणूच्या पृष्ठभागावरील टोकदार प्रथिनाला (स्पाइक प्रोटीन) बांधून घेत त्यांना पेशीत शिरायलाच अटकाव करण्याचे प्रयत्न याद्वारे केले गेले आहेत.

वैज्ञानिकांनी याकरता एसआयएच-५ नावाच्या पेप्टाइडचा वापर करत कोविडच्या विषाणूतल्या प्रथिनाचा पेशीत आढळणार्‍या एसीई-२ प्रथिनाशी होणार्‍या परस्परसंवादाला अटकाव करायचे ठरवले. एसआयएच-५ ची मात्रा त्यांनी प्रयोगाला वापरल्या जाणार्‍या उंदरांच्या एका गटाला दिली. दुसर्‍या उंदरांच्या गटाला अशी मात्रा दिली नाही. या दोन गटांना मग त्यांनी  कोविड विषाणूच्या संपर्कात आणले. प्रयोगांती  त्यांना असे आढळून आले की एसआयएच-५ ची मात्रा दिलेल्या उंदरांच्या फुफ्फुसातील पेशींची हानी तुलनेने खूपच कमी प्रमाणात झाली आहे.

या छोट्याशा प्रयोगाअंती भारतीय वैज्ञानिकांच्या विश्वासाला पुष्टी मिळाली आहे. प्रयोगशाळेत बनवलेल्या या कृत्रिम पेप्टाइडमध्ये आणखी किरकोळ बदल करुन ही पद्धत कोविडचेच नाही तर दोन प्रथिनांच्या परस्परसंवादांमुळे होणार्‍या इतर रोगांनाही अटकाव करता येईल असा त्यांना विश्वास वाटतो. 

संदर्भ:‌ Khatri, B., et al. A dimeric proteomimetic prevents SARS-CoV-2 infection by dimerizing the spike protein. Nature Chemical Biology. 2022. https://doi.org/10.1038/s41589-022-01060-0

----------------------------------------------------------

हा लेख 'दैनिक हेराल्ड'च्या १० ऑगस्ट २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.