global_warming लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
global_warming लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ११ जून, २०२२

माघारीचा पर्याय / Managed Retreat

२०१८ साली केरळात आलेली‌ पूरपरिस्थिती.
आभार: https://en.wikipedia.org/wiki/2018_Kerala_floods

हवामान बदल, जागतिक तापमानवाढ यावर वैज्ञानिक गेल्या अनेक वर्षांपासून इशारे देत आहेत पण धोरणकर्त्यांना यावरचे संशोधन म्हणजे वातानुकूलीत प्रयोगशाळेत बसून केलेली वायफळ बडबड वाटत होती. पण आता त्याचे परिणाम अगदी उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत तरी राज्यकर्त्यांना त्यावर त्वरेने धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे असे दिसत नाही. वारंवार येणारी वादळं, नद्यांना पूर, असह्य होणारा उकाडा, अवकाळी येणारा पाऊस, अतिवृष्टी या रुपात हवामान बदलाचे परिणाम दिसून येत आहेत. जागतिक स्तरावर, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यामुळे २०५० पर्यंत ३० कोटी लोकसंख्येवर त्याचा परिणाम होण्याचे भाकीत वर्तवले गेले आहे. २१ व्या शतकाच्या अखेरीस, हवामान कसे विकसित होते त्यानुसार हिंदी महासागरातील समुद्राची पातळी सुमारे ०.५-०.८ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्याने किनारपट्टीवरील पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमध्ये खाऱ्या पाण्याचा प्रवेश होईल. जैन आणि कर्मकर या जोडगोळीने करंट सायन्स नावाच्या नियतकालिकात लेख लिहून याला तोंड द्यायला कोणता निर्णय श्रेयस आहे त्याची चर्चा केली आहे, त्याचा हा आढावा. 

स्थूलमानाने नद्यांना पूर आले की त्याचे व्यवस्थापन तीन प्रकारे केले जाते - नद्यांवर बंधारे घालून किंवा त्याच्या प्रवाहाला इतरत्र वळणे देत पूर परिस्थितीवर नियंत्रण आणणे, पूर आला की तेथील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करणे, आणि तिसरा पर्याय म्हणजे पुराच्या पाण्याला कायमस्वरुपी वाट करुन देण्यासाठी आणि त्यापासून वारंवार निर्माण होणार्‍या धोक्यांपासून मानवजातीनेच सुरक्षित स्थळापर्यंत मागे हटणे. जेव्हा दरवर्षीच अशा प्रसंगांना तोंड द्यायची पाळी येते तेव्हा तिसरा पर्यायच शहाणपणाचा ठरतो. त्याला managed retreat (MR) म्हणजेच माघारीतून मिळवलेले यश असे म्हणता येईल!

या पर्यायाचा वापर सिंधू संस्कृतीपासून झालेला आढळतो. त्या ठिकाणच्या रहिवाशांना कायमस्वरुपी स्थलांतर करायला मोठा दुष्काळ भाग पाडणारा ठरला असे एक अनुमान काढले जाते. युरोपातही ऐतिहासिक काळात अशी उदाहरणे आहेत. स्थलांतर हे फक्त मानवी वस्तीपुरतेच नसते तर पशु-पक्षीही बदलत्या हवामानाला तोंड देण्याकरता स्थलांतर करतात हेही आपल्याला माहिती आहे. वादळादरम्यान समुद्रकाठी वसलेल्या रहिवाशांच्या तात्पुरत्या स्थलांतरामुळे मनुष्यहानी टळते हे आपण गेली काही वर्ष अनुभवत आहोतच. पूर रेषेची एकदा आखणी झाली की त्याच्या आत कुठलीही वसती करायची परवानगी द्यायची नाही ही जबाबदारी संबंधित शासनाची. सर्वसाधारणपणे भारतीय रहिवाशांना आपला भाग कायमस्वरुपी सोडून स्थलांतर करणे मानसिकदृष्ट्या खूप अवघड जाते कारण त्यांचे तेथील निसर्गाशी, वडिलार्जित मिळालेल्या जमीन-जुमल्याशी, शेजाराशी भावनिक नाते जुळलेले असते. या सगळ्यापासून दूर जाणे अवघड जरी असले तरी ते पटवून देणे, उत्तम पर्यायी व्यवस्था करणे ही जबाबदारीही संबंधित शासनाचीच. या रहिवाशांचे सोडा पण नव्याने तेथे मालमत्ता घेणारे महाभागही मोठ्या प्रमाणात आहेत. इंटरनेटवर गोव्यात समुद्राकाठी किती मालमत्ता विकाऊ आहेत याचा शोध घेतला तेव्हा एका संकेतस्थळावर ७१ जाहिराती आढळल्या. प्रत्येकी किंमत कोट्यावधी रुपयात! २०५० पर्यंत या मालमत्ता धोक्यात येऊ शकतात हे त्यांना कळत कसे नाही? मोठ्या शहरात नदीकाठावर, ओढ्याकाठी भराव घालून नव्या मालमत्ता उभ्या केलेल्या दिसून येतात त्या सगळ्याच दरवर्षी येणार्‍या पुरांमुळे धोक्यात आहेत असे दिसत आहे.

भारतात लोकसंख्येची घनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. सुमारे दर चौरस कि.मी. मध्ये ४२० जण वसती करुन असतात. कॅनडा, ब्राझील, अमेरिकेत हेच प्रमाण अनुक्रमे ४, २५, ३४ आहे. त्यातही मोठी शहरे सगळी समुद्राकाठी - ज्याची पातळी २०५० पर्यंत वाढण्याचे संकेत आहेत. सुमारे साडे-तीन कोटी भारतीय यामुळे एकविसाव्या शतकाअखेरीपर्यंत अडचणीत येऊ शकतात. या शहरांतील लोकसंख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. यांचे कायमस्वरुपी स्थलांतर करण्याची आवश्यकता आहे आणि त्याचे आपल्याकडे काहीही नियोजन नाही. आपत्तीग्रस्तांना दरवर्षी तात्पुरती मदत करण्यातच आपला खर्च होतो. धोरणात्मक निर्णय घेऊन जर कायमस्वरुपी स्थलांतराची सोय केली तर हा वारंवार होणारा खर्च टाळता येणे शक्य आहे, आणि तोच एक शहाणपणाचा, उत्तम पर्याय आहे असे हे संशोधक म्हणतात. याकरता येत्या २५ वर्षात, ५० वर्षात कुठल्या भागातल्या लोकांना स्थलांतर करावे लागेल याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करुन त्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करता येईल म्हणजे शेवटच्या क्षणी धावपळ होणार नाही. स्थलांतराच्या जागांचा जलविज्ञान, हवामानशास्त्रीय, भूवैज्ञानिक आणि पर्यावरणीय दृष्टीने विचार करणे आवश्यक ठरते नाहीतर आगीतून फुफाट्यात अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्याकरता आवश्यक असे कायदेही करावे लागतील. अर्थात स्थलांतर करायच्या जागांचा विचार देशपातळीवर न करता गावपातळीवर, प्रादेशिक स्तरावर करण्याची आवश्यकता ते मांडतात कारण लहान स्तरावरचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने होते असे त्यांचे म्हणणे आहे. 

शासन नियोजन, कायदे करील तेव्हा करो. वैयक्तिक पातळीवर आपण असे नदी किनारी, समुद्राकाठी राहात असू तर तेथून सुरक्षित जागी स्वतःहूनच हलण्याचा निर्णय घेणे हे शहाणपणाचे. मालमत्ता खरेदीचा विचार असेल तर अशी नदीकाठची, समुद्राकाठची मालमत्ता मोठी गुंतवणूक करुन न घेणे श्रेयस्कर. आपल्याच नाही तर आपल्या पुढच्या पिढीचा विचार केल्याबद्दल ती पिढी तुमची उतराई होईल. 

संदर्भ: Jain, S.K.; Karmakar, S. Managed retreat as an adaptation tool for inland and coastal flooding. Current Science. 122(10); 2022; 1115-1116. https://www.currentscience.ac.in/Volumes/122/10/1115.pdf

--------------------------

हा लेख 'दैनिक हेराल्ड' च्या ८ जून २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला. 



रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

अरबी समुद्र : चक्रीवादळांचे उगमस्थान? / Arabian Sea: Cyclone hotspot?



हिन्दी महासागर (सौजन्यः गुगल अर्थ)

उष्णकटिबंधीय क्षेत्रात वातावरणात निर्माण झालेल्या कमी दाबामुळे पण वार्‍याच्या जोरामुळे निर्माण झालेली चक्राकार स्थिती म्हणजे चक्रीवादळ. त्याच्या स्थानानुसार त्याला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. उदाहरणार्थ, अटलांटिक आणि पूर्वोत्तर पॅसिफिक महासागरात निर्माण होणार्‍या वादळाला 'हरिकेन' म्हणतात, 'टायफून' पश्चिमोत्तर पॅसिफिक महासागरात निर्माण होते, तर उत्तर पॅसिफिक आणि हिन्दी महासागरात निर्माण होणार्‍या वादळांना केवळ 'उष्णकटिबंधीय चक्रीवादळ' किंवा 'तीव्र चक्रावात' असे संबोधले जाते. भारतीय हवामान विभाग वादळांची त्यांच्या तीव्रतेनुसार वर्गवारी करतो. चक्रीवादळ (सायक्लोनिक स्टॉर्म), तीव्र चक्रीवादळ (सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म), अतिशय तीव्र चक्रीवादळ (व्हेरी सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म), भयंकर चक्रीवादळ (एक्स्ट्रिमली सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म) आणि दारुण चक्रीवादळ (सुपर सायक्लोनिक स्टॉर्म). साधारण दर ताशी १२०-१५० कि.मी. वार्‍याचा वेग असणार्‍या वादळांमुळे थोडेसे नुकसान होण्याची शक्यता असते त्याला प्रथम प्रवर्गातले चक्रीवादळ म्हणतात. दुसर्‍या प्रवर्गात (तीव्र चक्रीवादळ) वार्‍याचा वेग १५०-१८० कि.मी. होतो तेव्हा त्यापासून धोका आणखी वाढतो. तिसर्‍या प्रवर्गात (अतिशय तीव्र चक्रीवादळ) तो १८०-२१० कि.मी. होतो तेव्हा त्याची व्यापकता वाढते. तर चौथ्या प्रवर्गातले २१०-२५० कि.मी. वेगाने वाहणारे चक्रीवादळ भयंकर हानी पोहोचवतात आणि पाचव्या प्रवर्गात २५० कि.मी. हून अधिक वेग असणारी वादळं अति दारुण परिस्थिती निर्माण करतात. इ.स.२००० पासून हिन्दी महासागराशेजारी असलेल्या काही राष्ट्रांच्या समूहाने (बांगला देश, भारत, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड) ठरवलं की वादळाची चटकन् ओळख होण्याकरता ते नावाने ओळखले जावे. २०१८ साली इराण, कटार, सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमेरेट्स आणि येमेन हे देशही या समूहात सामील झाले. नाव ठेवण्यासाठी काही ढोबळ नियम केले गेले. जसे: नाव राजकारण, धर्म, संस्कृती, लिंग विरहित असावे; त्याने कोणाच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, त्यातून क्रूरतेचे दर्शन होऊ नये; लहान पण अर्थपूर्ण असावे; एकदा ठेवलेले नाव पुन्हा वापरले जाणार नाही याची दक्षता घेतली जावी, वगैरे.

गेल्या उन्हाळ्यात (मे २०२१) भारताच्या किनार्‍यांवर एका पाठोपाठ दोन वादळं येऊन गेली. 'तौते' (काही जण याचा उच्चार इंग्रजी वर्णानुसार 'तौक्ते' करतात) वादळाने अरबी समुद्र ढवळून काढला आणि १७ मे रोजी ते किनार्‍यावर थडकले त्यावेळी त्याचा वेग दर ताशी २२० कि.मी. होता. याच्या पाठोपाठ म्हणजे २६ मे रोजी 'यास' नावाचे वादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालात पोहोचले. याचा वेग दर ताशी १२० कि.मी. होता. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी वादळं तशी 'नेमेचि येणारी'. ती आली की पूर्वेकडच्या एखाद्या राज्यावर त्यांची संक्रांत येते.‌ ते टळले तर ती बांगला देश अथवा श्रीलंकेला पोहोचतात. अरबी समुद्र तसा शांत. पण गेल्या काही वर्षांपासून अरबी समुद्रातही तीव्र स्वरुपाची चक्रीवादळं सातत्याने येत असल्याचं दिसतंय. निलोफर (२०१४), सोमालिया, येमेनला थडकलेली चपला आणि  मेघ (२०१५), वायू (२०१९), निसर्ग (२०२०) आणि तौते हे या वर्षीचं (२०२१) अशी एकापाठोपाठ लागलेली वादळांची मालिका वैज्ञानिकांना चक्रावून सोडत आहे. २०१५ ची दोन वादळं वगळता इतर भारताच्या किनार्‍यावर थडकली आहेत. 

वैज्ञानिकांचे निरीक्षण आणखी एका बाबीचा मेळ घालते. अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत एकापाठोपाठ एक अशी वादळं येत आहेत. उदाहरणार्थ, २०१८ साली 'लुबान' (अरबी समुद्र) नंतर लगेचच 'तितली'ने (बंगालची खाडी) जन्म घेतला. २०२० साली 'अम्फान' (बंगालची खाडी) च्या पाठोपाठ 'निसर्ग' (अरबी समुद्र) तर २०२१ साली 'तौते' (अरबी समुद्र) आणि लगेचच 'यास' (बंगालची खाडी) अवतरले.

हिन्दी महासागराच्या उत्तरेच्या भागात भारताच्या पश्चिम किनार्‍यावर अरबी समुद्र तर पूर्व किनार्‍यावर बंगालची खाडी असे दोन भाग पडतात. बंगालच्या खाडीचे पाणी तुलनेने अरबी समुद्रापेक्षा उबदार असते. ही ऊब वादळांना जन्म द्यायला कारणीभूत ठरते. अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे कमी तापमान आणि प्रतिकूल वारा ही तीव्र स्वरुपाची चक्रीवादळं अरबी समुद्रात पूर्वी नसण्याची महत्त्वाची कारणं. बंगालच्या खाडीपेक्षा अरबी समुद्राच्या पाण्याचे तापमान कमी ठेवण्यासाठी तशी निसर्गाची ठेवणच कारणीभूत ठरत होती. पण आता जागतिक तापमानवाढीमुळे तीन महासागरात हिन्दी महासागराचे आणि त्यातही अरबी समुद्राचे पाणी बर्‍यापैकी तापत असल्याचे संशोधकांचे निरीक्षण आहे (आकृती) आणि ही वाढ चौथ्या ते पाचव्या प्रवर्गाच्या चक्रीवादळांना जन्म देत निसर्ग, वित्त आणि मनुष्यहानीला कारणीभूत ठरत आहेत. हा बदल साधारणपणे १९९५ पासून पुढे दिसून येत असल्याचे ते म्हणतात. ही वाढ केवळ पृष्ठभागाच्या पाण्यापुरती मर्यादित नाही तर खोल समुद्रातले पाणीही तापत आहे. वैज्ञानिक याला समुद्रातील उष्णता धारणक्षमता या नावाने ओळखतात.

आकृती : अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान आणि कार्बन डायऑक्साईडची धारणा (सरासरी आणि कल) (१९६०-२०११)) सौजन्यः संदर्भ क्र.२
आकृती : अरबी समुद्राच्या पृष्ठभागाच्या पाण्याचे तापमान आणि कार्बन डायऑक्साईडची धारणा (सरासरी आणि कल) (१९६०-२०११)) सौजन्यः संदर्भ क्र.२

अरबी समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढते असण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. सुमारे १९९० पर्यंत अरबी समुद्राचे वर्षातून दोनदा जल-शीतन होत असे. प्रथम जून ते सप्टेंबर दरम्यान जेव्हा खोलवरचे थंड पाणी उसळून पृष्ठभागावर (अपवेलिंग) येते तेव्हा आणि नंतर नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान जेव्हा शीत वातावरण आणि वारे पृष्ठभागावर असलेल्या समुद्राच्या पाण्याशी संयोग साधतात तेव्हा. या दोन्ही प्रक्रियांमुळे, सौरउर्जेमुळे आणि कार्बन डाय ऑक्साइडच्या पाण्यातील साठवणूकीमुळे वर्षभरात वाढलेले पाण्याचे तापमान उतरते. पण १९९० नंतर जागतिक तापमानवाढीमुळे पाण्यातील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण इतके वाढत गेले की या दोन्ही नैसर्गिक क्रिया पाण्याच्या शीतकरणासाठी अपुर्‍या पडायला लागल्या. अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढण्याचे आणखी एक कारण आहे. ते म्हणजे हिन्दी महासागर डायपोल (द्विध्रुव). या दरम्यान पूर्वेकडील हिन्दी महासागराच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा कमी होते तर पश्चिमेकडील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते आणि यामुळेही अरबी समुद्रातील चक्रीवादळांना जन्म द्यायला कारणीभूत ठरते. काही वैज्ञानिक मानवनिर्मित वातविलेपाचे (एरोसॉल) कारणही सांगतात. एकूणच पाण्याचे तापमान वाढण्याची वेगवेगळी कारणे आहेत आणि त्यामुळे अरबी समुद्रात वादळे निर्माण होण्याची संख्या वाढती आहे हे मात्र खरे.

भारताच्या पश्चिम किनार्‍याजवळ राहाणार्‍या मराठी बहुल नागरिकांनी अशा वेळी कोणती काळजी घ्यायची? एक तर याची मानसिक तयारी करणे आवश्यक आहे. म्हणजे असे की यंत्रणांनी अशा वादळाचा अंदाज दिला की शक्य तेवढ्या आपापल्या मालमत्ता सांभाळत समुद्रापासून जमेल तितके लगेच लांब जायचे म्हणजे किमान मनुष्यहानी तरी टळेल. निसर्गाला तोंड देताना नैसर्गिक पर्यायांचाच वापर करायचा. उत्तम पर्याय म्हणजे किनार्‍यांवर खारफुटी वनस्पतींची जंगलं वाढवायची. या वनस्पती खार्‍या पाण्यात वाढतात आणि त्यांची मुळं जमिनीला घट्ट धरुन ठेवतात. त्यांच्या अस्तित्वामुळे वादळादरम्यान वार्‍याचा वेग कमी व्हायला मदत होते आणि मालमत्तांची किमान हानी होते. खारफुटीची जंगलं किनार्‍यावर असतातच. पण त्यावर अतिक्रमण करत ती नष्ट करुन तेथे वस्ती करण्याची हाव माणसाला गप्प बसू देत नाही. किमान अशा ठिकाणी निर्माण होणार्‍या मालमत्ता विकत घेण्यापासून तरी स्वतःला परावृत्त करायचे. मोठी शहरे किनार्‍याजवळ वाढताहेत. त्यांच्या गटाराची व्यवस्था उत्तमच असायला हवी म्हणजे वादळामुळे जमिनीवर येणार्‍या पाण्याचा निचरा पुन्हा समुद्रात वेगाने होईल असे नियोजन झाले पाहिजे. यातील काही निर्णय वैयक्तिक पातळीवर तर काही सामाजिक, राजकीय पातळीवरचे आहेत. वैयक्तिक पातळीवरील निर्णयाबाबतीत तरी प्रत्येकाने सजग असायलाच हवे.

संदर्भ: 

  1. Dasgupta, A. Arabian Sea emerging as a cyclone hotspot. Nature India. 18 June 2021. https://jwp-nindia.public.springernature.app/en/nindia/article/10.1038/nindia.2021.86
  2. D’Mello, J.R.; PrasannaKumar, S. Processes controlling the accelerated-warming of the Arabian Sea. International Journal of Climatology, vol.38(2); 2018; 1074-1086. https://doi.org/10.1002/joc.5198
  3. PrasannaKumar, S., et al. Response of the Arabian Sea to global warming and associated regional climate shift. Marine Environmental Research 68(5); 2009; 217-222. https://doi.org/10.1016/j.marenvres.2009.06.010.

हा लेख इ-शैक्षणिक संदर्भ अंक १३१ (ऑगस्ट – सप्टेंबर २०२१) मध्ये प्रसिद्ध झाला. 

***

रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६

खनिज स्त्रोतांकडून वनस्पतीज स्त्रोतांकडे / From mineral oils to natural oils

रासायनिक उद्योगांमध्ये खनिज तेलाला पर्याय म्हणून वनस्पतींपासून मिळवलेल्या तेलांकडे मोठ्या आत्मीयतेनं पाहिलं जात आहे. त्याची मुख्य कारणं दोन: खनिज तेलाचा मर्यादित साठा आणि दुसरं म्हणजे त्याच्या अति वापरामुळे प्रदूषणाची उंचावणारी पातळी. अमेरिकेनं हल्लीच खनिज तेलाचं मोठ्या प्रमाणात देशांतर्गत उत्पादन सुरु केल्यामुळं त्याचे बाजारभाव सध्या तरी आटोक्यात आहेत. नाहीतर वाढते भाव हे ही एक महत्वाचं कारण होतं. प्रदूषणाचे चटके मात्र आता सगळ्यांनाच जागतिक तापमानवाढीच्या स्वरुपात जाणवू लागले आहेत. १०-१५ वर्षांपूर्वी जेव्हा वैज्ञानिक याची शक्यता ओरडून सांगत होते तेव्हा ते विनोदानं, उपहासानं आणि तुच्छतेनं ऐकलं जायचं. आता मात्र अति पाऊस पडणे, अवेळी पडणे, अजिबात न पडणे, हवेत सतत उकाडा हे नित्याचंच झालं आहे आणि त्यामुळे हा विषय सामान्य माणसापासून ते जगाचं राजकारण करणार्‍यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी आहे आणि म्हणून वनस्पती तेलांकडे एक अक्षय आणि पर्यावरणाला अनुकूल असा स्त्रोत म्हणून पाहिलं जात आहे. औद्योगिक विकासाची कास ज्या राष्ट्रांनी गेल्या काही दशकात धरली तेथे शेती उद्योग कमी होत गेला. जर वनस्पती तेलं उद्योगांसाठी कच्च्या मालाचा स्त्रोत म्हणून उदयाला आली तर शेती उद्योगालाही पुनः महत्त्व प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असं मानलं जातं. वनस्पती तेलांमधल्या मेदाम्लांचा वापर आजही साबण, सौंदर्य प्रसाधनं, वंगण, शाई, विरलतकं (diluent), वगैरे उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ही तेलं वापरुन पॉलिमर राळेची (रेझिन्सची) निर्मितीही होऊ शकते आणि म्हणून तो खनिज तेलाला पर्याय ठरु शकतो हे लक्षात आलेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात त्या शक्यता तपासून पाहाण्यासाठी संशोधन सुरु आहे. एकाच प्रकारच्या सेंद्रिय रेणूंची लांबलचक साखळी म्हणजे पॉलिमर. पॉलिमर्सचा वापर आज प्रत्येक मानवाच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. वेगवेगळ्या स्वरुपात पॉलिमर्सपासून बनलेल्या वस्तूंचा वापर प्रत्येकजण करतच असतो. पॉलियुरेथेन्स (polyurethanes - PU) हा पॉलिमर राळेचा (रेसिन) एक प्रकार. याचा वापर फर्निचर, गाद्या-उशा, वाहन  उद्योग, बांधकाम, पादत्राणं, विविध प्रकारची उपकरणं (appliances), तसंच लेपांमध्ये (रंग, रोगण (वॉर्निश)), चिकटद्राव (adhesives), भेगा आणि छिद्र बुजवायला (sealants), रबरासारख्या लवचिक गुणधर्म (elastomers) असणार्‍या वस्तू बनवायला केला जातो. चिकटपणा, मूळ वस्तूवर ओरखडे न येऊ देणं, पाणी आणि आम्लासारख्या वहनशील द्राव्य वस्तूंचा मूळ वस्तूवर परिणाम न होऊ देणं, धातूंच्या वस्तूंवर गंज न चढू देणं हे पॉलियुरेथेन्सचे महत्त्वाचे गुणधर्म.

गुरुवार, ३ डिसेंबर, २०१५

पावसाळ्याला ग्रासणार्‍या राक्षसांची गोष्ट/ Effect of global warming on rains

'हवाई जहाज' की गलबत? चेनै चा २०१५ चा पाऊस 
वायू प्रदूषणाची वाढती पातळी ही सगळ्यांच्याच आरोग्याला, विशेषतः विकसनशील देशांना धोकादायक ठरणार आहे असे इशारे जागतिक आरोग्य संघटना (WHO) एका तपापासून देतेय. विशेषतः चीन आणि भारतातील शहरांत होणार्‍या वायू प्रदूषणाच्या वाढीमुळे दरवर्षी सुमारे २० लाख लोकांना अकालीच प्राणाला मुकावं लागतंय. ही बातमी पुरेशी वाईट नाही असं वाटावं अशी परिस्थिती डॉ.रघू मुर्तुगुड्डे आणि त्यांचे सहाध्यायी यांनी केलेल्या संशोधनातून आली आहे. या संशोधनात भारतीयांचं योगदानही आहे. रघू मुर्तुगुड्डे हे भारतीय वंशाचे संशोधक मेरीलँड विद्यापीठात संशोधन करतात आणि पृथ्वी विज्ञान शास्त्रात त्यांच्या संशोधनाकडे आदरानं पाहिलं जातं. यांच्या असं लक्षात आलंय की या देशांमधील वाढत्या वायू प्रदूषण आणि धूलीकणांच्या थरांमुळे शतकभरात मोसमी पावसाची सरासरी २० टक्क्यांनी घटली आहे.

इंग्रजीतील 'मान्सून' हा शब्द अरबी भाषेतील 'मोसम' या ऋतुपासून आला आहे. उन्हाळ्यानंतरचा आशिया खंड चिंब करणारा मोसमी पाऊस हा निसर्गातील एक मोठा चमत्कारच आहे. अनादि कालापासून हा कवी आणि लेखकांना स्फूर्ती देत आलेला आहे. वर्षानुवर्ष १ जूनच्या सुमारास याचं आगमन ठरलेलं होतं. याची सुरुवात भारताच्या दक्षिण टोकापासून होते. जरी याचं आगमन जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत करणारं असलं तरी या निसर्गाच्या देणगीकडे सगळ्यांचे डोळे लागलेले असतात. वार्षिक सरासरीच्या सुमारे ८० टक्के पाऊस या उपखंडात या ऋतुत होतो आणि म्हणूनच हा येथे वास्तव्य करणार्‍यांसाठी जीवनाधार ठरला आहे. जसं त्याच्या आगमनाची वेळ ठरलेली आहे तसंच त्याच्या ओसरण्याचीही. वर्षातले तब्बल चार महिने मुक्काम ठोकलेला पाऊस ३ ऑक्टोबरच्या दरम्यान पुन्हा पुढच्या वर्षी येण्यासाठी रजा घेतो. त्याच्या या वारंवारितेमुळे 'नेमेचि येतो मग पावसाळा' ही  काव्यपंक्ती प्रसिध्द झाली असावी.

वातावरणातील आणि भूभौतिकीय घटनांचा एकत्रित अभ्यास मोसमी पावसाचा अंदाज बांधायला मदत करतात. उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून वहाणार्‍या व्यापारी वार्‍यांचं मीलन आणि विषुववृत्ताच्या आसपास उच्चतम पातळी गाठणारी सूर्याची उष्णता, संपूर्ण पृथ्वीला वेढणारा रुंद असा ढगांचा पट्टा आणि वादळं निर्माण करते. याला आंतर-उष्णकटीबंधीय केंद्रभिमुख क्षेत्र (Inter Tropical Convergence Zone - ITCZ) असं म्हणलं जातं. हे क्षेत्र उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि ऋतुबदलानुसार उत्तरेकडून दक्षिणेकडे हेलकावत असते.

समुद्राच्या पाण्यापेक्षा पृथ्वीवरचा भूभाग वेगानं तापत असल्यानं आणि विषुववृत्ताच्या उत्तरेकडे भूभागाची व्याप्ती अधिकतम असल्यानं हे क्षेत्र उत्तर गोलार्धातल्या उन्हाळ्याच्या दरम्यान जास्तच सक्रिय होतं. जरी हा मोसमी प्रवाह सगळ्याच खंडांशी निगडीत असला तरी दक्षिण आशियाई मान्सून जास्तच सक्रिय होतो कारण या ठिकाणी खंडाचा अधिकतम भूभाग उष्ण कटीबंधीय प्रदेशात सरकलेला दिसतो. शिवाय भव्य आणि उंचच उंच अशा हिमालय पर्वताच्या रांगा आणि तिबेटीय पठार या भूभागाचे तापमान आणखी वाढवायला हातभार लावतात. हिन्दी महासागरासारखा शेजारी मग या दक्षिण आशियाई रखरखत्या भूभागाची उष्णता आपल्याकडे खेचून मोसमी बदल घडवून आणण्यात आपला वाटा उचलतो.

जागतिक तापमानवृध्दीमुळं खरं तर आतापावेतो दक्षिण आशियाई भूभागाचं तापमान हिन्दी महासागरापेक्षा वेगानं वाढून दोन्हीत मोठा फरक दिसून यायला हवा होता आणि परिणामी दक्षिण आशियात पावसाचं प्रमाण वाढायला हवं होतं. भावी कालात ऋतुमान कसं असेल याचा अंदाज घेणारे बहुतांश अभ्यास असं वर्तवतात की जागतिक तापमानवृध्दी २१व्या शतकात दक्षिण आशियाई भागात जास्त पाऊस घेऊन येईल पण वस्तुस्थिती मात्र वेगळेच चित्र उभे करतेय. भारताच्या उपखंडावर २०व्या शतकात पावसाचं प्रमाण सातत्यानं, विशेषतः पाकिस्तान आणि गंगेपासच्या मैदानी प्रदेशात, खालावतंय  असं शतकभरच्या पावसाच्या सरासरी नोंदींवरुन दिसून येतं. याचं कारण वैज्ञानिकांना एक गूढच बनलं होतं.

'नेचर कम्युनिकेशन्स' (http://www.nature.com/ncomms/2015/150616/ncomms8423/abs/ncomms8423.html) मधल्या नुकत्याच प्रसिध्द झालेल्या लेखात या संशोधकांनी हे कोडं सोडवायचा प्रयत्न केला आहे. वायू प्रदूषणात होत असलेली वाढ दक्षिण आशियाई भूभागाच्या तापमानात घट होण्यास कारणीभूत आहे असं त्यांच्या निदर्शनास आलं आहे. दरम्यान हिन्दी महासागराचं तापमान  मात्र वाढतंय आणि मग भूभाग आणि सागराच्या तापमानात जे अंतर असायचं ते नाहीसं होत चाललं आहे. हे भूभाग आणि सागराच्या तापमानातलं नाहीसं होत जाणारं अंतर मोसमी पावसाच्या नैसर्गिक क्रियेत अडथळा बनून त्याला क्षीण करतंय. हिन्दी महासागरातल्या पाण्याची वाफ त्याच्या तापमानाच्या वाढीमुळे अवश्य होतेय, पण हा वाफेच्या रुपातला पाऊस दक्षिण आशियाई प्रदेशावर वाहून न आणला जाता तो सागरातच पडतोय.

याशिवाय, दक्षिण आशियाई मान्सूनवर अल निनोचा आणि मागील कित्येक दशकांतील प्रशांत महासागरावरील हवामानाच्या वैविध्यामुळे होणार्‍या दोलायमान स्थितीचाही प्रभाव असतो. भारतातल्या वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासातून आढळून आलंय की १९७०च्या दशकात प्रशांत महासागरावरील हवामानाच्या व्युत्क्रमामुळे (इन्व्हर्शन) निर्माण झालेली स्थितीही मोसमी पावसाच्या आगमनाचा काल पुढे ढकलतेय. तेव्हापासून अल निनोच्या तीव्रता आणि वारंवारितेमुळे पावसाचं आगमन १ जून ऐवजी ५ जूनच्या आसपास होतंय. तसंच हा मोसमी पावसाळा १९७० च्या दशकापासूनच त्याच्या नेहमीच्या वेळेच्या कितीतरी पूर्वी माघार घेतोय. पावसाचं गेल्या काही दशकातलं उशीरा आगमन आणि नियोजित वेळेपूर्वीची माघार एकूण पावसाळ्याचे दिवस कमी करतेय आणि त्यामुळे जीवनदायी पर्जन्यमानाच्या सरासरीत विचार केला तर त्यात घट दिसतेय.

पावसाच्या पाण्याच्या या अनुपलब्धतेमुळे दक्षिण आशियाई प्रदेशात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या नासाच्या अहवालानुसार याचा परिणाम भूजलावर होऊन त्याच्या पातळीत, बर्‍याचशा देशात पण विशेषतः चीन आणि भारतात, मर्यादेपलिकडे घट होत असल्याचं दिसून आलं आहे.

लोकसंख्येत वाढ आणि उंचावणारे रहाणीमान यामुळे या देशांत पर्जन्यमानातली ही घट अधिकच भयावह ठरते. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे विकार होतात हे माहीत होतंच पण आता हा प्रश्न केवळ काहींच्या आरोग्यापुरता मर्यादित राहिला नसून जर त्यामुळे पावसावर परिणाम होणार असेल तर तो जीवनाला ग्रासणारा असल्यानं त्याच्या निर्मूलनाकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही.

वायू प्रदूषण टाळण्याकरता तुम्ही हे नक्कीच करुन खारीचा वाटा उचलू शकाल: 

  • अनावश्यक विजेचा वापर टाळा - गरज नसताना दिवे, पंखे, उपकरणे बंद करा वातानुकुलन यंत्राचा वापर टाळा 
  • अन्नाची नासाडी टाळा, स्वयंपाकघरातला कचरा घरातल्या कुंड्यात/बागेतच जिरवा 
  • प्लॅस्टिक, कागद, काच, पत्राजन्य वस्तू फेकून देण्यापेक्षा त्या ते गोळा करणार्‍यांना द्या 
  • घरात जास्तीत जास्त नैसर्गिक उजेड आणि हवा खेळू द्या 
  • सौर उर्जेचा वापर जिथे शक्य असेल तेथे करा, अंगणातल्या आणि सामायिक वापराच्या ठिकाणच्या (उदा. जिना, व्हरांडा) दिव्यांना टाईमर लावा 
  • स्वच्छतेकरता पाण्याचा अतिवापर टाळा 
  • धुम्रपान टाळा 
  • खरेदीला जाताना कापडी पिशव्या सोबत बाळगा. प्लॅस्टिक पिशव्या नाकारा 
  • सतत वापरायच्या उपकरणांमध्ये पुनः प्रभारित होणार्‍या बॅटर्‍यांचा वापर करा 
  • वाहनांच्या चाकात योग्य हवा, तेलजन्य पदार्थ असल्याची खात्री करा 
  • वाहन थांबवल्यानंतर ते बंद करा 
  • जेथे चालत जाणे शक्य असेल तेथे वाहनाचा वापर टाळा, शक्य तेथे सार्वजनीक वाहनांचा वापर करा, एकत्र प्रवास करा 
  • दर सुटीला स्वतःचे वाहन काढून सहलीला जाण्याचे टाळा, त्यापेक्षा घरी बसून वाचन करा 
  • कामाच्या वेळा लवचिक करण्याचा विचार करा ज्यायोगे गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल
---------------------------------------------------------------
हा लेख इ-साहित्य दरबारच्या 'दीपोत्सव-२०१५ च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला.

मंगळवार, ३ डिसेंबर, २०१३

कल्पवृक्षाच्या छायेत / Impact of climate change on coconut production

वाढत्या कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. येत्या काही वर्षांमध्ये सरासरी तपमानात वाढ, पावसाच्या नित्यतेवर त्याचे होणारे परिणाम, अति उष्ण आणि अति शीत लाटा, दुष्काळ, पूर असा हवामानाचा अतिरेकी लहरीपणा दिसून येणार आहे. अशा घडामोडी फक्त भविष्यातच वाढून ठेवल्या नाहीत तर आताच याची झलक आपण बर्‍याच वेळेला अनुभवत आहोतच. या सगळ्याचा परिणाम साहजिकच शेतीवर, शेती उत्पादनांवर होणार आहे. याला तोंड द्यायला नव्या धान्यांची वाणं, बदललेल्या व्यवस्थापन पद्धती, यावर मोठ्या प्रमाणात संशोधन चालू आहे. धान्यांच्या शेतीला महत्व असतेच पण बागायती उत्पादनंही तितकीच महत्वाची असतात. कारण एकदा का त्याची लागवड केली की वर्षानुवर्ष, बारमाही उत्पादन त्यातून घेता येऊ शकतं. नारळाच्या झाडाचं उदाहरण घ्या ना! एकदा का ते झाड लावलं की सुमारे ५० वर्ष ते फळ देत रहातं.

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१३

भारतातील धरणं उष्णता वाढीस कारणीभूत: भ्रमाचा भोपळा फुटला / Global warming from Indian reservoirs: A delusion

तिळारी धरण
भारतीय जलाशय, जलसिंचनाच्या सोयी आणि जलविद्युत निर्मिती केंद्र ही अनुमान आणि समजुतीपेक्षा कितीतरी कमी प्रदूषण आणि हरितगृह वायू निर्माण करणारी आहेत असा निष्कधरणं र्ष भारतीय वैज्ञानिकांनी काढला आहे.

सूर्यावरून आलेली किरणं पृथ्वीवरून परावर्तित होताना वातावरणातील जे वायू ती शोषून आवरक्त प्रारण (infrared radiation) करतात त्यांना हरितगृह वायू म्हणतात. हेच आज सतत चर्चेत असलेल्या वैश्विक उबेस (global warming) कारणीभूत आहेत. बाष्प, कार्बन डायऑक्साईड, मिथेन,

शनिवार, १ जून, २०१३

निवड: सतीच्या वाणाची की सुधारित वाणाची? / Choice: Hunger or GM crops

सुधारित वाणांचा वापर करून भुकेवर मात करायची की उपाशी मरायचं यावर दोन्ही अंगानी केलेला उहापोह

वनस्पतींचं नवं लाभदायक वाण तयार करण्याचं तंत्र माणसानं आत्मसात करून शेकडो वर्ष झाली. दोन जाती/प्रजातींतून त्यांच्यातल्या चांगल्या गुणांसाठी त्यांचं प्रजनन करुन नवं वाण निर्माण करत माणसानं प्रगती साधली. अधिक धान्य देणारं, किडीला समर्थपणे तोंड देणारं सुधारित वाण संशोधनातून निर्माण होत राहिलं. तसं पाहिलं तर अशा प्रजननामुळे आता इतके नवे वाण वापरात आहेत की मूळ वाणाचं बियाणंच कुठे मिळू नये! वनस्पतीतील जनुकंच विशिष्ट गुणधर्म ठरवतात हे यातून मानवाला कळलं होतं.