health लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
health लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ५ एप्रिल, २०१४

पोलिओ निर्मूलनाच्या आक्षेपांचे खंडन / Polio eradication: Discussion

भारताच्या पोलिओमुक्तीचा सोहळा. आभारः द गार्डियन, छायाचित्रः सौरभ दास
भारतातून पोलिओचं निर्मूलन झालं, तो पोलिओमुक्त देश झाला असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जानेवारी २०१४ मधे जाहीर केलं. इतिहासाची पानं चाळली तर भारतात हा प्रयत्न १९७८ पासून होतोय असं दिसतं. त्या वेळी केलेले प्रयत्न वाया गेले. त्यानंतर १९८८ च्या दरम्यान पुन्हा एक मोहीम राबवली गेली आणि त्या वेळी २००० सालापर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचं ठरवलं गेलं. हा मुहूर्तही चुकला. यानंतर मात्र भारतीय संशोधकांनी जमा केलेल्या माहितीचा आधार घेऊन पोलिओच्या निर्मूलनासाठी देण्यात येणार्‍या लसीत आणि कार्यपध्दतीत बदल केला गेला आणि अखेरीस २०१४ मध्ये हे उद्दिष्ट साध्य झाल्याचं दृष्टिपथात येतंय. अर्थात अद्यापही पोलिओचे रुग्ण सापडताहेत आणि सापडतील पण त्यांना कशा प्रकारे यातून मुक्त करावं याची दिशा ठरलेली आहे. पोलिओ हा बेफामपणे पसरणार्‍या पोलिओ विषाणूंमुळे (wild poliovirus - WPV) होतो. या विषाणुंचे तीन प्रकार आहेतः WPV-१, WPV-२ आणि WPV-३. भारतातील पोलिओच्या निर्मूलनाच्या प्रयत्नांची कथा वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडीकल कॉलेजचे डॉ. जेकब जॉन यांनी विस्तृतपणे मांडली आहे (करंट सायन्स, खंड १०५, अंक ९, पृष्ठ ११९९) आणि त्याचा आढावा मी माझ्या ब्लॉगवर  पूर्वीच घेतला आहे.

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१३

सुई शिवाय इंजेक्शन / Needleless drug delivery

स्थळ सरकारी रुग्णालय. वेळ सकाळची. ठराविक वेळेत इथे बालकांना लस दिली जाते. त्यामुळे गर्दी. सगळ्या माता आपआपल्या बाळांना घेऊन आपला नंबर कधी लागतोय याची वाट पहात बसलेल्या आहेत. तसं एकाच वेळेस अनेक बालकांना लस दिली जातेय पण गर्दीच इतकी आहे की थोडा कोलाहल माजलाच आहे. सगळीच बालकं त्यांना सुई टोचल्यावर कळवळून रडताहेत. तर त्यांचा आवाज ऐकून रांगेतल्या इतर बाळांच्या हळुवार मनालाही कसली तरी अनामिक भीती वाटतेय आणि तेही आपला आवाज त्यांच्या आवाजात मिसळताहेत. त्यांना या संवेदनाशून्य जगाचा अद्याप परिचय व्हायचा आहे ना! परिचारिका मात्र निर्विकारपणे एका पाठोपाठ एक बाळांना इंजेक्शनद्वारे नाहीतर तोंडावाटे लस देण्यात गर्क आहेत. बाळांचं रडणं त्यांना सवयीचंच झालं आहे. बाळांच्या आयांनाही बाळाला टोचल्यावर त्यांना दुखलं म्हणून वाईट वाटतंय पण हे होणारंच हे सगळ्यांनीच अध्याहृत धरलंय. पिढ्यानपिढ्या हेच चाललंय. त्यात विशेष ते काय? परिचारिकांना आणि आयांना त्यात विशेष असं वाटत नसलं तरी वैज्ञानिकांना मात्र तसं वाटत नाही. सुई शिवाय इंजेक्शन देता आलं तर किती मजा येईल नां? त्याच खटपटीत ते आहेत आणि आपण या लेखात त्यांच्या ह्या प्रयत्नाचा आढावा घेणार आहोत.

शनिवार, १७ ऑगस्ट, २०१३

गोविंदाSS, सावध रे! / Dahi handi pyramid participants, please be cautious


दही हंडी - जय भारत सेवा संघ, चित्र आभार: विकीपिडीया
दही हंडी फोडण्यासाठी पिरॅमिड्स बांधताना गोविंदांनी घ्यायची काळजी: अपघातांच्या अभ्यासातून केलेले निदान 

पुराणकथांमधून समाजाला जगण्याचं सार गोष्टीरुपात शिकवलं जात असे. त्यामुळे ऐकणारा आपल्या कुवतीनुसार त्यातून अर्थ काढून रमत असे. सण, उत्सव यांचा हेतू या साराची उजळणी करण्यासाठी आहे. भगवान श्रीकृष्णाच्या दही चोरण्याची कथाही अशीच आपल्याला समाजात कसं जगावं याचं दर्शन घडवते. कृष्णाचा जन्म कंसाच्या कारागृहात जरी झाला असला तरी त्याचं बालपण गोकुळात गोपींच्या सान्निध्यात त्यांच्याशी खेळत, त्यांच्या खोड्या काढत गेलं. त्यांनी शिंक्याला बांधलेलं दही, लोणी चोरून खाणं ही गोष्ट रंगवून सांगितली जाते. इतक्या उंचावर बांधलेलं दही हा एकटा खाणार तरी कसा? तर त्याच्या सवंगड्यांना बरोबर घेऊन. एकमेकाच्या खांद्यावर उभं रहात ते दह्यापर्यंत पोहोचत आणि आनंद लुटत. सवंगडी वेगवेगळ्या जातीतले, परिवारातले. ध्येय साध्य करायचं असेल तर त्यांच्यात भेदभाव करून चालणार नाही ही यातून मिळणारी शिकवण. तसंच लोणी, दही हे स्निग्ध पदार्थ. शिंक्याला बांधलेल्या या पदार्थांचा हंडी फोडल्यावर सगळ्यांच्या अंगावर वर्षाव होई आणि एकमेकात स्नेह कसा निर्माण करायचा हे यातून कळे.