India लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
India लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

वैद्यकीय कचर्‍याची समस्या आणि उपाय / Biomedical Waste: Problems and Solutions

शाश्वत विकासाच्या संदर्भात भारताचा क्रमांक १६५ राष्ट्रांमध्ये १२० वा लागतो. कचरा प्रक्रियेबाबत उदासिनता हे याचे एक महत्वाचे कारण. त्यात गेल्या काही वर्षात कोविड महामारीने 'दुष्काळात तेरावा महिना' असे म्हणायला हवे. वैद्यकीय सेवांमधून निर्माण होणारा कचर्‍यात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि या धोकादायक कचर्‍याची विल्हेवाट हा एक अतिमहत्वाचा प्रश्न निर्माण झाला. यासंदर्भात संशोधकांनी या गंभीर बाबीचा आढावा घेतला आहे त्याचा हा गोषवारा.

वैद्यकीय कचरा विविध वैद्यकीय सेवांमधून निर्माण होतो. मानव तसेच प्राण्यांच्या स्वास्थ्यासाठी दिलेल्या निदान, उपचार आणि लसीकरण तसेच जैविक संशोधन आणि विकास या त्या वैद्यकीय सेवा. यातून निर्माण होणारा ८५% कचरा हा कमी जोखमीचा असला तरी उरलेल्या कचर्‍यातील सुमारे १०% कचर्‍यातून संसर्गजन्य रोगांचा फैलाव होण्याची आणि सुमारे ५% कचरा किरणोत्सर्गी किंवा रासायनिक असल्याने तो अतिधोकादायक ठरतो. त्यामुळे ४० लाख मुलांसकट सुमारे ५२ लाख लोक मृत्यू पावतात असे जागतिक आरोग्य संस्थेचे अनुमान आहे. भारतात दररोज सुमारे ७७५ टन वैद्यकीय कचरा निर्माण होतो आणि यात सरासरी ७% वार्षिक वाढ नोंदलेली आहे. सुमारे ३००० इस्पितळे, ३,२२,००० इतर आरोग्य सेवा सुविधा केंद्रे, २१००० अलगीकरण कक्ष, १५०० नमुना चाचणी केंद्र आणि २६४ प्रयोगशाळांतून कोविड महामारी दरम्यान दररोज १०१ टन वैद्यकीय कचर्‍याने यात मोठीच भर घातली आणि कचर्‍याच्या विल्हेवाटीची समस्या आणखीच गंभीर केली आहे. १० मे २०२१ रोजी तर २५० टनाइतकी नोंद झाली. आरोग्य सेवा केंद्रांपैकी सुमारे १३% केंद्रांनी वैद्यकीय कचर्‍याच्या विल्हेवाटीची नियमावली पाळली नाही असे नजरेस आलेले आहे. दररोज सुमारे ७४ टन कचरा योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता खोल खड्ड्यात ढकलला जातो. कोविड महामारीमुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय कचर्‍याची योग्य तर्‍हेने विल्हेवाट न लावल्यामुळे कोरोनाच्या नव्या जातीतील विषाणूंना आणि इतर संसर्गजन्यरोगांना जन्म देण्याची भीती व्यक्त केली जाते. 

आकृती: वैद्यकीय कचर्‍याच्या धोक्यानुसार
 त्याचे करावयाचे वर्गीकरण
वैद्यकीय कचर्‍याच्या धोक्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. तो वेगवेगळ्या डब्यात साठवला जातो. त्या डब्यांना रंगांचे संकेत दिले आहेत. जसे शरीराचे भाग, रासायनिक आणि घाणेरडा कचरा, केमोथेरपीचा कचरा, औषधी उत्पादने आणि प्रयोगशाळेतील कचरा यांची विल्हेवाट लावण्याकरता पिवळ्या डब्यांचा वापर केला जातो. लाल डबा दूषित प्लास्टिक कचऱ्यासाठी, निळा डबा काच आणि रोपणासाठी वापरलेल्या धातूच्या कचर्‍यासाठी, पांढरा डबा धातूच्या धार-दार वस्तूंसाठी, काळा डबा इतर घातक कचऱ्यासाठी तर हिरवा डबा विघटन होणार्‍या साध्या कचऱ्यासाठी वापरला जावा असे संकेत आहेत.

गोव्याच्या शेजारच्या राज्यांमध्ये सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावायची सोय केलेली आहे असे संशोधक म्हणतात. पण गोव्यातही हल्लीच पिवळा, लाल, निळ्या आणि पांढर्‍या डब्यातला कचरा हाताळायची सोय झालेली दिसतेय. कुंडई औद्योगिक वसाहतीत बायोटिक वेस्ट सोल्युशन्स प्रा.लि. नावाच्या कंपनीला ही जबाबदारी दिली असल्याचे इतर संकेतस्थळे शोधल्यावर कळते. जगातल्या सर्वोत्कृष्ट भट्टीचा उपयोग ते कचरा जाळण्यासाठी करतात असा त्यांच्या संकेतस्थळावर दावा आहे. 

कोविडमुळे वैद्यकीय कचर्‍यात अचानक झालेली वाढ आणि त्याची विल्हेवाट लावणे ही नागरिकांना लस देण्याइतकेच बिकट काम होते. दिलेल्या प्रत्येक इंजेक्शनची सिरिंज, १०-२० जणांना लस दिल्यानंतर (किंवा वाया गेलेल्या) लसीच्या काचेच्या बाटल्या रिकाम्या होऊन कचर्‍यात भर पडते. मुखावरणे (मास्क), चेहरा झाकणारी कवचे, हातमोजे, पोशाख (पीपीई किट्स) यांची भरही वैद्यकीय कचर्‍यात पडतच असते. अनेकदा ते आजूबाजूच्या कचर्‍यातही आढळतात. या वस्तूंना पुन:प्रक्रियेला पाठवण्यापूर्वी त्यांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक ठरते आणि यासंबंधी संबंधित घटकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. 

महामारीच्या उद्रेकामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याला तोंड देण्यासाठी करायच्या काही उपाययोजना खालीलप्रमाणे नमूद केल्या आहेत:

  • मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा ज्या राज्यांमध्ये निर्माण होतोय तेथे घातक कचरा जाळण्याचे संयंत्र, औद्योगिक स्तरावर बंदिस्त ठिकाणी कचरा जाळण्याची सोय करणे यासारख्या वैकल्पिक व्यवस्था निर्माण करण्यावर भर
  • रुग्णालयाबाहेरील लसीकरण शिबिरांमध्ये निर्माण होणारा कचर्‍याचे योग्य प्रकारे विलगीकरण
  • जैव-वैद्यकीय कचऱ्याच्या संकलनादरम्यान बार-कोडिंगची योग्य अंमलबजावणी करणे, ज्यायोगे कचऱ्याच्या स्त्रोताचा सुनिश्चित मागोवा घेता येणे शक्य होईल
  • कचरा निर्मितीच्या ठिकाणीच त्याचे त्याच्या स्तरानुसार योग्य असे अलगीकरण करण्याकरता जागरुकता निर्माण करणे
  • कचरा निर्मितीच्या ठिकाणांची मध्यवर्ती केंद्रावर व्यवस्थित नोंद ठेवणे
  • कचरा निर्मिती केंद्र, संस्करण केंद्र, निवडक कचरा जाळणार्‍या भट्ट्या यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी अविरत नोंद ठेवण्याची सोय
  • राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांद्वारे तळागाळात आरोग्य सेवा कर्मचार्‍यांसाठी आणि राज्य मंडळाच्या अधिकार्‍यांसाठी व्यापक प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित करणे
  • यासंबंधीच्या नियमांचे पालन न करणार्‍या आरोग्य सुविधांविरुद्ध नियामक प्राधिकरणांकडून कठोरपणे पर्यावरण नुकसान भरपाई शुल्क वसूल करणे

आकृती सौजन्य: बायोटिक वेस्ट सोल्यूशन्स प्रा.लि. कुंडई

संदर्भ:‌ Saxena, P. Redefining bio-medical waste management during COVID-19 in India: A way forward. Mater Today Proc. 2022; 60: 849–858. doi: 10.1016/j.matpr.2021.09.507

----------------------------------------

हा लेख दैनिक हेराल्डच्या ३१ ऑगस्ट २०२२ च्या अंकात प्रसिद्ध झाला.





रविवार, २७ जून, २०२१

उष्ण पाण्याचे झरे: उत्क्रांती आणि मूलद्रव्ये /Thermal springs: Evolution and elements

 उष्ण पाण्याचे झरे हा प्रकार तसा विरळा. पावसाचे आणि नदी-ओढ्यातले पाणी सगळीकडेच जमिनीत मुरते. पण काही ठिकाणी त्यातील भेगांतून, भ्रंशांतून (फॉल्ट्स) ते खोलवर जाते. पृथ्वीच्या भूभागाची उष्णता खोलीनुसार वाढत असल्यामुळे मुरणार्‍या पाण्याशी तिचा संयोग होऊन पाणीही तापते. या तापण्याच्या क्रियेमुळे पाण्यावरचा दाब वाढतो आणि ते उसळून भूभागावर येते. यालाच आपण उष्ण पाण्याचे झरे म्हणतो. पाणी मुरताना खडकांशी होणारा त्याचा संयोग पाण्याचे गुणधर्म बदलास कारणीभूत ठरतो कारण त्यातील घटक पाण्यामध्ये शोषले जातात. या गुणधर्मांनुसार कुठल्या प्रकारच्या खडकांशी त्याचा संयोग झाला हे ठरवता येते. 

आकृती १: उष्ण पाण्याचे झरे असलेली ठिकाणे आणि नमुने गोळा केलेल्या ठिकाणांचा नकाशा
आकृती १: उष्ण पाण्याचे झरे असलेली
ठिकाणे आणि नमुने गोळा केलेल्या
ठिकाणांचा नकाशा
भारतामध्ये उष्ण पाण्याचे झरे एकूण सात पट्ट्यांमध्ये - हिमालयाच्या उत्तर-पश्चिम रांगात, सोहाना (हरयाणा), तुवा (गुजरात) आणि सोन-नर्मदा-ताप्ती (सोनाटा) नद्यांचे क्षेत्र या गुजरात ते पश्चिम बंगालपर्यंतच्या पूर्व-पश्चिम पट्ट्यात, गोदावरीच्या खोर्‍यात (मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश), महानदीच्या खोर्‍यात (छत्तीसगढ) आणि महाराष्ट्रात पश्चिम किनार्‍यालगत - आढळतात. दक्षिणोत्तर पसरलेल्या महाराष्ट्राच्या पश्चिम किनार्‍यालगत सुमारे ३५० कि.मी. लांबीच्या पट्ट्यात पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत एकूण १८ ठिकाणी (आकृती १) साठापेक्षा अधिक संख्येने उष्ण पाण्याचे झरे सापडतात. या झर्‍यांतील पाण्याची उष्णता ४० ते ७२ अंश सेल्सियस आहे. या प्रांताला भूशास्त्रीय भाषेत दक्खन ज्वालामुखीचा प्रांत (डेक्कन व्होल्कॅनिक प्रॉव्हिन्स) असे म्हणतात. सुमारे ५ लाख चौरस कि.मी. चा प्रशस्त भूभाग जगातल्या सर्वात मोठ्या बसाल्टच्या साठ्याने (ज्वालामुखीच्या लाव्हा रसामधून तयार झालेला खडक) व्यापलेला आहे. हा दक्षिणोत्तर पट्टा लांब पण अरुंद अशा चरांनी आणि भ्रंशांनी चिरफाळलेला आहे आणि या पट्ट्यात उष्ण पाण्याचे झरे सर्वसाधारणपणे भारताच्या पश्चिम किनार्‍याशी समांतर अशा पश्चिमोत्तर आणि पूर्व-दक्षिण दिशांमधील भ्रंशात सापडतात. या पट्ट्यात बसाल्टच्या थराची जाडी सुमारे ६०० ते २५०० मीटर इतकी आहे. ही जाडी उत्तरेकडून दक्षिण दिशेला कमी-कमी होत जाते. राजापूरजवळचा भूभाग तर त्रिस्तरीय आहे. तळचा थर पृथ्वीच्या निर्मितीच्या सुमारास (अतिपुरातन - प्रीकँब्रियन) तयार झालेल्या ग्रेनाईट, पट्टिताश्म आणि क्वार्ट्झाइटने बनलेला, मग त्यावर गाळाचा खडक आणि त्यावर बसाल्टच्या खडकाचे थोड्या-फार प्रमाणात अस्तित्व दिसते.

बोरॉन समस्थानिके (आयसोटोप) आणि दुर्मिळ मृदा मूलद्रव्ये वापरुन आयआयटी-मुंबईच्या संशोधकांनी महाराष्ट्रातल्या पश्चिम किनार्‍यावरील उष्ण पाण्यातील रासायनिक मूलद्रव्यांचा शोध घेतला त्याचा हा वृत्तांत. रासायनिक गुणधर्मांव्यतिरिक्त त्यांनी झर्‍यांच्या, पावसाच्या आणि समुद्राच्या पाण्याचे उच्च तापमान मोजले. शिवाय दाबाखाली जेव्हा बसाल्ट आणि ग्रॅनाइट खडकाशी संयोग होतो तेव्हा त्याचे पाण्यावर काय परिणाम होतात याचे अनुमान काढण्यासाठी प्रयोग करुन माहिती गोळा केली. याचा उपयोग त्यांना उष्ण पाण्याच्या झर्‍यांचे मूळ आणि उत्क्रांतीचा शोध घेणे सोयीचे झाले.

संशोधकांनी या परिसरातील १५ उष्ण पाण्याच्या झर्‍यांतून, ८ भूजल आणि २ नद्यांतून पाण्याचे नमुने गोळा केले. ते गोळा करताना पाण्याचे तापमान, पीएच (एक लिटर पाण्यातील हायड्रोजन आयनांची ग्रॅममध्ये संहति दर्शविणारी संक्षिप्त संज्ञा) आणि वाहकतेचीही (conductivity) नोंद घेतली. या प्रयोगाअंती त्यांना असे आढळले की तुलनेने उत्तरेकडील उष्ण झर्‍यांच्या आणि विहिरींच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार (सोडियम आणि कॅल्शियम क्लोराईड) आहेत आणि त्यामुळे त्याची वाहकताही वाढली आहे. अर्थात काही ठिकाणी सल्फेट्सचे प्रमाणही आढळले. याला अपवाद हा राजापूरच्या झर्‍यांचा. राजापूरच्या झर्‍यांमध्ये बायकार्बोनेट्सचे अधिक्य त्यांनी नोंदवले (आकृती २). समुद्राच्या पाण्याशी होणार्‍या संयोगामुळे उत्तरेकडील पाण्यात क्षारांचे प्रमाण जास्त असल्याचे ते नमूद करतात. विहिरी आणि नद्यांच्या पाण्यातही कॅल्शियम/ सोडियम क्लोराईड मोठ्या प्रमाणात आहे. उष्ण पाण्याच्या झर्‍यांत उच्च तापमानात बसाल्ट आणि समुद्राच्या पाण्याची रासायनिक क्रिया मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कार्बोनेट्सपेक्षा क्षारता वाढायला कारणीभूत आहे असे त्यांचे अनुमान आहे. राजापूरच्या झर्‍यांमध्ये ग्रेनाईटसारख्या खडकाशी पाण्याचा संयोग होत असल्याने बायकार्बोनेट्समध्ये वाढ आणि त्यातील मुख्य आणि लेश मूलद्रव्यांचे घटक त्या पाण्याचे ग्रेनाइटच्या खडकातून अभिसरण झाल्याचे स्पष्टपणे दर्शवितात. एकूण या सगळ्या झर्‍यांचे पाणी अल्कधर्मी ते उदासीन (ना अल्क ना आम्ल) अशा गुणधर्माचे असल्याचे ते नमूद करतात. त्यांचा बोरॉन समस्थानिकांचा अभ्यास प्रथमच गाळाच्या खडकाची (कडलगी आणि धारवाड) निर्मिती सागरी गाळातून झाल्याचे आणि त्याच दरम्यान उन्हावरे-फरारे आणि तुरल येथील झरे विकसित झाल्याचे सिद्ध करतो तर बेरियम आणि फ्लोरिन या मूलतत्वांची राजापूर येथील झर्‍यातील पाण्यातील घनता ग्रेनाईटच्या खडकातून विकसित झाल्याचे ते सिद्ध करतात. एका प्रतिमानानुसार त्यांनी असेही दाखवून दिले की सुमारे २००० मीटर खोलीवर असलेल्या पाण्याचे तापमान सुमारे ५५ अंश सेल्सियस असू शकते.

आकृती २: पश्चिम किनार्‍यावरील उष्ण पाण्याच्या झर्‍यांची उत्क्रांती दाखवणारे आरेखन
आकृती २: पश्चिम किनार्‍यावरील उष्ण पाण्याच्या झर्‍यांची उत्क्रांती
दाखवणारे आरेखन

या पट्ट्यातील झर्‍यांचे तीन भागात विभाजन करतातः १. उत्तरेकडील झरे (अधिकतम क्षारयुक्त पाण्याचे - समुद्राच्या पाण्याशी संयोग होत असल्यामुळे), २. मधल्या भागातले झरे (र्‍हायोलाईट - हा ही ज्वालामुखीतून निर्माण झालेला खडक - खडकाचे अधिक्य असलेला भाग) आणि ३. दक्षिणेच्या टोकाचे झरे (मठ आणि राजापूर; बेरियम आणि बोरॉन चे अधिक्य असलेल्या गाळाच्या खडकाची उपस्थिती आणि त्याखाली अतिपुरातन खडकाचा थर असलेला भाग).

उष्ण पाण्यात घन पदार्थ विरघळण्याची क्षमता थंड पाण्यापेक्षा नेहमीच जास्त असते. उष्ण पाण्याच्या झर्‍यात म्हणून वर नमूद केल्याप्रमाणे त्याचा विविध खडकांशी संयोग झाल्यामुळे त्यात अगदी साध्या कॅल्शियमपासून ते लिथियम-रेडियमपर्यंत सर्व प्रकारची खनिजे विरघळलेल्या रुपात आढळतात. उष्णता आणि अशा विविध घटकांनी श्रीमंत झालेले असे विरळ्या ठिकाणी उपलब्ध असलेले पाणी निसर्गोपचाराकरता उपयोगी असल्याचे म्हटले जाते. या झर्‍यातले स्नान आरोग्यास लाभदायक ठरते असा अनेकांचा विश्वास आहे. पण या विश्वासाला नवसंशोधनाची फारशी जोड मात्र सापडत नाही. अर्थात पाण्यात डुंबणे हा विरंगुळा असतो. तणाव कमी झाल्याने सकारात्मकता वाढीस लागते आणि मग एकूणच मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. उष्ण, विशेषत: बायकार्बोनेट्सनी युक्त पाण्यामुळे रक्ताभिसरण सुलभ होते आणि त्यामुळे रक्तदाबासारख्या विकारापासून मुक्तता मिळते, स्नायू शिथील होतात, सांधेदुखीसारख्या शारीरिक वेदना कमी होण्यास मदत होते. मज्जासंस्थांच्या विकारांपासून आराम मिळतो असे काही सांगतात. सल्फर आणि सल्फेटचे अधिक्य असलेले उष्ण पाण्याचे झरे त्वचाविकारावर, श्वसन विकारावर उपयोगी असल्याचा अनुभव काही जण सांगतात. एका अभ्यासानुसार पर्शियातील उष्ण झर्‍याच्या पाण्यामुळे सोरायसिसची लक्षणे कमी होत असल्याचे आढळले आहे. पुरळ वगैरेसारख्या त्वचाविकारांपासूनही आराम मिळतो,  यकृतरोग आणि पोटाच्या विकारावरही याचा गुण येतो असे म्हटले जाते. जवळ जवळ सगळ्याच उष्ण पाण्याच्या झर्‍यांत सोडियम/कॅल्शियम क्लोराईड असतेच. याचा उपयोग संधीवात, मज्जासंस्थांच्या विकारावर, अस्थिव्यंगोपचारादरम्यान आणि स्त्रीरोगविषयक आजारांवरही होतो असे म्हटले जाते. 

उष्ण पाण्याच्या झर्‍यात केलेले स्नान काहीवेळा अपायकारकही ठरु शकते. पाण्याचे तापमान सहन करता येण्यापलिकडे असेल तर अशा पाण्यात न उतरलेलेच बरे! एकट्याने पाण्यात उतरणे, डोके पाण्यात बुडवणे, पाणी गिळणे, खूप वेळ पाण्यात बसणे, वगैरे अवश्य टाळावे. ज्यांना हृदयरोगाची लक्षणं आहेत, गरोदर माता, शरीरावर फोड आले किंवा कापलेले असेल, घसरुन पडण्याची आणि चक्कर येण्याची भावना होत असेल त्यांनी अशा पाण्यात न उतरणेच श्रेयस्कर.

- संदर्भ : 

१. Chandrasekhar, T. et al. Understanding the evolution of thermal fluids along the western continental margin of India using geochemical and boron isotope signatures. Geothermics. 74; 2018; 197-209. https://doi.org/10.1016/j.geothermics.2018.03.007. 

२. Hot springs therapy: Mineral content. https://www.blueriverresort.com/hot-springs/mineral-content/

३. What is hot potting, and is it safe? https://www.healthline.com/health/hot-potting#safety-tips

- आकृती सौजन्यः Geothermics. 74; 2018; 197-209. https://doi.org/10.1016/j.geothermics.2018.03.007.
- या लेखाचा विषय समजावून घ्यायला माझे मित्र भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. अनिल वळसंगकर यांची मदत झाली. त्यांचे आभार.  

***

शनिवार, ५ एप्रिल, २०१४

पोलिओ निर्मूलनाच्या आक्षेपांचे खंडन / Polio eradication: Discussion

भारताच्या पोलिओमुक्तीचा सोहळा. आभारः द गार्डियन, छायाचित्रः सौरभ दास
भारतातून पोलिओचं निर्मूलन झालं, तो पोलिओमुक्त देश झाला असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जानेवारी २०१४ मधे जाहीर केलं. इतिहासाची पानं चाळली तर भारतात हा प्रयत्न १९७८ पासून होतोय असं दिसतं. त्या वेळी केलेले प्रयत्न वाया गेले. त्यानंतर १९८८ च्या दरम्यान पुन्हा एक मोहीम राबवली गेली आणि त्या वेळी २००० सालापर्यंत हे उद्दिष्ट साध्य करण्याचं ठरवलं गेलं. हा मुहूर्तही चुकला. यानंतर मात्र भारतीय संशोधकांनी जमा केलेल्या माहितीचा आधार घेऊन पोलिओच्या निर्मूलनासाठी देण्यात येणार्‍या लसीत आणि कार्यपध्दतीत बदल केला गेला आणि अखेरीस २०१४ मध्ये हे उद्दिष्ट साध्य झाल्याचं दृष्टिपथात येतंय. अर्थात अद्यापही पोलिओचे रुग्ण सापडताहेत आणि सापडतील पण त्यांना कशा प्रकारे यातून मुक्त करावं याची दिशा ठरलेली आहे. पोलिओ हा बेफामपणे पसरणार्‍या पोलिओ विषाणूंमुळे (wild poliovirus - WPV) होतो. या विषाणुंचे तीन प्रकार आहेतः WPV-१, WPV-२ आणि WPV-३. भारतातील पोलिओच्या निर्मूलनाच्या प्रयत्नांची कथा वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडीकल कॉलेजचे डॉ. जेकब जॉन यांनी विस्तृतपणे मांडली आहे (करंट सायन्स, खंड १०५, अंक ९, पृष्ठ ११९९) आणि त्याचा आढावा मी माझ्या ब्लॉगवर  पूर्वीच घेतला आहे.

शनिवार, ११ जानेवारी, २०१४

पोलिओचे उच्चाटन: भारताचे योगदान / India's contribution to polio elimination

भारतात शेवटच्या पोलिओच्या रुग्णाची नोंद १३ जानेवारी २०११ रोजी झाली. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला पोलिओ होणार्‍या देशांच्या यादीतून नंतर आणखी रुग्णांची नोंद होतेय का याची वर्षभर वाट पाहून २०१२ साली वगळले. आता तीन वर्षांअखेर (१३ जानेवारीला २०१४) आणखी रुग्णांची नोंद न झाल्यामुळे यासंबंधी अधिकृत प्रमाणपत्र मिळण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संसर्गजन्य रोगांवर मात ही मानवाच्या नैपुण्याची साक्षच. काही वर्षांपूर्वी देवीच्या रोगावर अशीच मात करण्यात भारत यशस्वी झाला होता. बुळकांड्या/ढेंडाळ्या (rinderpest) या गुरांमध्ये होणार्‍या संसर्गजन्य रोगापासूनही आपण मुक्त झालो याची फारशी माहिती सामान्य वाचकांना नसण्याची शक्यता आहे. पोलिओ हा बेफामपणे पसरणार्‍या पोलिओ विषाणूंमुळे (wild poliovirus - WPV) होतो. या विषाणुंचे तीन प्रकार आहेतः WPV-१, WPV-२ आणि WPV-३.

मंगळवार, ६ ऑगस्ट, २०१३

भारतातील धरणं उष्णता वाढीस कारणीभूत: भ्रमाचा भोपळा फुटला / Global warming from Indian reservoirs: A delusion

तिळारी धरण
भारतीय जलाशय, जलसिंचनाच्या सोयी आणि जलविद्युत निर्मिती केंद्र ही अनुमान आणि समजुतीपेक्षा कितीतरी कमी प्रदूषण आणि हरितगृह वायू निर्माण करणारी आहेत असा निष्कधरणं र्ष भारतीय वैज्ञानिकांनी काढला आहे.

सूर्यावरून आलेली किरणं पृथ्वीवरून परावर्तित होताना वातावरणातील जे वायू ती शोषून आवरक्त प्रारण (infrared radiation) करतात त्यांना हरितगृह वायू म्हणतात. हेच आज सतत चर्चेत असलेल्या वैश्विक उबेस (global warming) कारणीभूत आहेत. बाष्प, कार्बन डायऑक्साईड, मिथेन,

शनिवार, १ जून, २०१३

निवड: सतीच्या वाणाची की सुधारित वाणाची? / Choice: Hunger or GM crops

सुधारित वाणांचा वापर करून भुकेवर मात करायची की उपाशी मरायचं यावर दोन्ही अंगानी केलेला उहापोह

वनस्पतींचं नवं लाभदायक वाण तयार करण्याचं तंत्र माणसानं आत्मसात करून शेकडो वर्ष झाली. दोन जाती/प्रजातींतून त्यांच्यातल्या चांगल्या गुणांसाठी त्यांचं प्रजनन करुन नवं वाण निर्माण करत माणसानं प्रगती साधली. अधिक धान्य देणारं, किडीला समर्थपणे तोंड देणारं सुधारित वाण संशोधनातून निर्माण होत राहिलं. तसं पाहिलं तर अशा प्रजननामुळे आता इतके नवे वाण वापरात आहेत की मूळ वाणाचं बियाणंच कुठे मिळू नये! वनस्पतीतील जनुकंच विशिष्ट गुणधर्म ठरवतात हे यातून मानवाला कळलं होतं.

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

अक्षय ऊर्जेद्वारे भारत आपली ऊर्जेची गरज भागवू शकेल का? / Can India harness its energy needs from renewable energy resources

आजमितीस भारत आपली ८०% ऊर्जेची गरज कोळसा आणि नैसर्गिक वायू या स्त्रोतांतून भागवत आहे. ही जीवाष्म इंधनसंपदा संपणारी तर आहेच पण त्याच्या वापराने पृथ्वीस हानीकारक अशा हरितगृह वायूंची निर्मिती होते. अणुऊर्जा निर्माण करून बरीचशी गरज भागवावी असा एक विचारप्रवाह आहे. पण त्याला जपानमध्ये त्सुनामीनंतर आलेल्या संकटामुळे विरोध वाढत आहे. ह्याच पार्श्वभूमीवर जर्मनीने २०२० पर्यंत अणुऊर्जेचा वापर कमी करण्यात येईल असे जाहीर केले आहे. त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले अक्षय ऊर्जेचे स्त्रोत तपासायला सुरुवात केली आहे. कदाचित ते त्यांची उद्दिष्टे पुरी करुही शकतील.

आपल्याला या दृष्टीने विचार करायचा असेल तर प्रथम हे पहावे लागेल की आपल्याकडे असलेल्या अक्षय ऊर्जास्त्रोतांतून आपण आपली किती गरज भागवू शकू. मोठ्या प्रमाणात यावर विचारमंथन होत आहे. 'करंट सायन्स' (खंड १०३, अंक १०; पृष्ठ ११५३-११६१) या नियतकालिकात आयआयटी, मुंबईतील मानद प्राध्यापक सुखात्मे यांनी हल्लीच एक छान आढावा घेतला आहे. त्यातील विचार चिंतनीय आहेत. प्रा. सुखात्मे अणुशक्ती नियामक मंडळाचे २००० ते २००५ पर्यंत अध्यक्ष ही होते. भारताच्या लोकसंख्यावाढीस २०७० सालापर्यंत स्थैर्य येईल असा अंदाज आहे त्यावेळच्या गरजा ते आपल्या लेखात मांडतात.