रविवार, २३ मार्च, २०१४

अनिष्ट परिणामांशिवाय रक्ताची गुठळी फोडणारं अनोखं औषध / A novel clot-buster without side-effects

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने (हृदयस्नायूंना रक्तपुरवठा करण्यात अडथळा आल्याने) भारतात दरवर्षी सुमारे २५ लाख मृत्यू होतात. हा दर सतत वाढता असल्याचंही आढळून आलं आहे. बदलतं राहणीमान, बैठी कार्यपध्दती, आहारातले बदल यामुळे हे असं होत आहे. हृदयविकार म्हणजे नेमकं काय? हृदयावर उठून दिसणार्‍या हृद् रोहिण्या हृदयस्नायूंना प्राणवायू आणि अन्नद्रव्याचा पुरवठा करतात. या रोहिण्यांच्या आतल्या पृष्ठभागावर चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ यांचं एक जाड किटण जमा होतं. हे किटण मग रक्तातल्या इतर घटकांना आणि कोशिकांनाही आकृष्ट करुन घेतं आणि गुठळ्या निर्माण होतात. मग या रोहिण्यांतून हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. याला मग हृदयविकाराचा झटका येणं आणि याच कारणामुळे जेव्हा मेंदूला अपुरा रक्तपुरवठा होतो तेव्हा त्याला आघात (स्ट्रोक येणं) असं म्हटलं जातं. ही किटण जमण्याची प्रक्रिया खरं म्हणजे प्रत्येकाच्या बालपणापासूनच होत असते.

 चरबी, कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थ यांचं एक जाड
किटण रोहिण्यांच्या आतल्या पृष्ठभागावर जमा होत
रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण करणारी रक्ताची गुठळी

या गुठळ्या फोडण्यासाठी अनेक वर्षं प्रयत्न चालू होते. त्याला १९५०च्या दशकात यश येऊ लागलं आणि नंतर १९८० मध्ये सुधारित रुपात औषधं निर्माण केली गेली. हे औषध सुरुवातीला रोहिण्यांतून दिलं जात असे पण नंतर शीरेतून (नीलेतून) द्यायला सुरुवात झाली. आजमितीस ह्रदय विकाराचा झटका आल्यावर लगेच ही उपचार पद्धती अमलात आणली तर ३०-४०% रुग्णांना त्यातून जीवनदान मिळतं.

प्लाझ्मिनजनक ऊती संक्रियक (Tissue plasminogen Activator - tPA), युरोकाईनेज (Urokinase - UK), स्ट्रेप्टोकाईनेज (Streptokinase -SK) ही सगळी हृदयविकाराच्या झटक्यावरची गुठळी फोडणारी जीवनदायी औषधं सध्या वापरात आहेत. tPA आणि UK या औषधांची निर्मिती ही मानवाच्या अवयवांपासून केली जाते. त्यामुळे ती अतिशय कमी प्रमाणात होत असल्यानं त्यांचं व्यापारी तत्वावर उत्पादन घेणं क्लिष्ट आणि अव्यवहारी ठरतं. अर्थात प्रयोगशाळेत डीएनए चं संयोजन (rDNA) करून हा भार थोडा हलका करता येतो. तरीही rDNA चा वापर करुन tPA पासून बनवलेलं औषध हे स्ट्रेप्टोकाईनेजपासून बनवलेल्या औषधापेक्षा सुमारे दहा पट महाग असू शकतं. कारण स्ट्रेप्टोकाईनेजची निर्मिती स्ट्रेप्टोकोकस (Streptococcus) बॅक्टेरिया आंबवून करता येते आणि त्यामुळे किंमतीतला हा फरक दिसून येतो.

भारतात काही वर्षांपूर्वी सीएसआयआर च्या चंदीगड येथील सूक्ष्मजीव तंत्रज्ञान संस्थेत नैसर्गिक स्वरुपात स्ट्रेप्टोकाईनेजच्या निर्मितीची प्रक्रिया शोधून काढली गेली आणि त्याचं उत्पादन करायला अहमदाबादच्या कॅडिला फार्मा लि. ने हक्क विकत घेतले. २००३ सालापर्यंत हे औषध भारतात आयात करावं लागायचं आणि त्याची किंमत जरी इतर पध्दतीने बनवलेल्या औषधांपेक्षा कमी असली तरी सामान्य भारतीयांच्या क्रयशक्तीच्या पलिकडचीच होती. आज दोन पायर्‍या वापरुन शुध्द केलेल्या नैसर्गिक स्ट्रेप्टोकायनेजपासून एसटीपीएस (STPase) या नांवाने विकल्या जाणार्‍या औषधानं अनेकांच्या आयुष्याची दोरी लांबवली आहे. याच संस्थेने नंतर ई-कोलाय (Escherichia coli) नांवाच्या बॅक्टेरियावर rDNA चा वापर करुन अल्पखर्चात मोठ्या प्रमाणात स्ट्रेप्टोकाईनेजची निर्मिती करायचं तंत्रही शोधून काढलं आणि चेन्नैच्या शसून औषध आणि रसायन निर्मिती करणार्‍या कंपनीला व्यापारी तत्वावर निर्मिती करण्याचे हक्क दिले. हे उत्पादनही आज बाजारपेठेत उपलब्ध आहे.

अनिष्ट परिणाम
या सगळ्या उपचारपध्दतीत मुळात एक दोष आहे. स्ट्रेप्टोकाईनेज हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला दिल्यानंतर रक्तात अप्रत्यक्षपणे प्लाझ्मिनजनक संक्रियक क्रिया सुरु होते आणि प्रथम रक्तातल्या प्लाझ्मिनजनकाशी १:१ या तत्वावर रससूत्रमिति होते. ही सूत्रमिति सगळ्याच प्लाझ्मिनजनक संयुगांना प्लाझमिनमध्ये वेगवेगळ्या जीवरासायनिक प्रक्रियांच्या पायर्‍यांवर रुपांतरित करते. हे अनिश्चित स्वरुपातलं प्लाझमिन, जे प्रोटिएज म्हणून ओळखलं जातं, ते रक्ताभिसरण संस्थेत वाहून नेलं जातं आणि त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या विरघळवण्यास मदत होते. हे सगळं छान असलं तरी त्याचे काही अनिष्ट परिणामही होतात. जिथं रक्ताची गुठळी विरघळवण्यासाठी प्लाझमिनची गरज आहे त्याठिकाणापुरतीच ही क्रिया घडून येत नाही तर रक्ताभिसरण संस्थेतील सर्वच प्रथिनांना यात सामावून घेऊन सगळ्याचंच प्लाझमिन तयार केलं जातं आणि त्यामुळे रक्तातली प्रथिनं नष्ट होऊन रोहिण्या विरल होतात, परिणामी अंतर्स्त्राव होण्याची शक्यता वाढते. थोड्याफार फरकानं ही क्रिया आतापर्यंत उपलब्ध असलेल्या सगळ्याच (tPA आणि UK पासून बनवलेली औषधंही यात आली) औषधांमुळे होते. वस्तुतः रक्तातली प्रथिनं नष्ट होऊन चालत नाही कारण त्यांचं रक्ताभिसरण संस्थेतलं कार्य बहुरुपी असतं. उदाहरणार्थ, ती रक्तातल्या मेदांना (लिपिड्स), संप्रेरकांना (हार्मोन्स), जीवनसत्वांना (व्हिटॅमिन्स) आणि धातूंना एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेण्याचं काम करतात, अकोशिकीय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवतात, रक्ताची रोगप्रतिकारशक्ती टिकवून ठेवतात आणि गरज असेल तेव्हा विकरांचं (एन्झाइम) कामही करतात.

आता अनिष्ट परिणाम टळणार 
हे अनिष्ट परिणाम कसे टाळता येतील किंवा कसे कमी तरी करता येतील या शोधात आतापावेतो शास्त्रज्ञ होते आणि त्यांना याची किल्ली सापडली! गेली अनेक वर्ष त्यांनी स्ट्रेप्टोकाईनेजच्या जडणघडणीचा आणि कार्याचा अभ्यास करून यातले नेमके कुठले घटक रक्तावर परिणाम घडवतात हे शोधून काढलं. या माहितीच्या आधारे त्यांनी एक आगळं संयुग रक्ताची गुठळी विरघळवण्यासाठी शोधलं. हे नवं संयुग (स्ट्रेप्टोकाईनेज मधून वेगळं केलेलं प्रथिन), नैसर्गिक किंवा संयोजित केलेल्या डीएनए तून मिळवलेल्या औषधासारखं लगेच सक्रिय होण्याऐवजी, रक्तात मिसळल्यानंतर त्याच्याशी गुठळीचा संयोग होईपर्यंत निष्क्रिय राहतं. त्यामुळे रक्तवाहिन्यातील प्लाझ्मिनजनकांना कुठल्याही प्रकारची हानी पोहोचत नाही. मात्र एकदा का त्याचा रक्ताच्या गुठळीशी संबंध आला की मग ते सक्रिय होतं, तिला आपल्यात बांधून घेतं, मग गुठळीत आणि त्याभोवती प्लाझ्मिन तयार करायला आरंभ करुन गुठळीचा भेद करतं.

या गुठळी विशिष्ट स्ट्रेप्टोकाईनेज (Clot Specific Streptokinese - CSSK) चा विकास आणि व्यापार विकसनशील आणि विकसीत देशात केला जाईल. या करता अमेरिकेच्या न्यू यॉर्क येथील नॉस्ट्र्म फार्मास्युटिकल्सशी करार झाला आहे. डॉ. निर्मल मुळ्ये या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. या औषधाची पहिली चाचणी सुदृढ स्वयंसेवकांवर केल्यावर् त्यांना याचा कसलाही त्रास झाल्याचं दृष्टीपथात आलेलं नाहीये. आता याच्या चिकित्सालयीन चाचण्यांच्या दुसर्‍या फेरीसाठी भारताच्या औषध नियंत्रकाकडून (Drugs Controller General of India) परवानगी मिळाली आहे. हे औषध २०१६ पर्यंत बाजारात यावं. हे संयुग (औषध) एकदाच इंजक्शननं दिलं जातं. सध्या अस्तित्वात असलेली औषधं द्यायला तासाभराचा अवधी लागतो. उपचार करताना जो अंतर्स्त्राव सध्या वापरात असलेल्या औषधामुळे होत असे त्याची भीती या औषधात नसेल. याची किंमत साधारणपणे २००० ते ३००० रुपयांच्या दरम्यान असेल - आत्ता अस्तित्वात असलेल्या औषधाच्या अर्ध्या किमतीत! CSSK ही एक भारताने जगाला दिलेली देणगीच असणार आहे आणि म्हणून या संशोधनासाठी अविरत काम करणार्‍या वैज्ञानिकांचं अभिनंदन करायला हवं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा