निर्मूलन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
निर्मूलन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ६ जुलै, २०२२

गोव्यातल्या रेबीज निर्मूलनाची यशोगाथा / Rabies Control: Success Story from Goa

आभार: फेसबुक 

रेबीज हा एक अत्यंत संहारक असा आणि मुख्यतः संक्रमित प्राण्यांकडून, विशेषतः रेबीजग्रस्त कुत्र्यांच्या चाव्याव्दारे मानवांमध्ये पसरणारा हा संसर्गजन्य रोग आहे. इतर संसर्गजन्य रोगांमुळे होणार्‍या मृत्यूंपेक्षा रेबीजमुळे होणारे मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे. दरवर्षी यामुळे हजारो लोकांचा मृत्यू होतो आणि मुख्यत्वेकरुन यात लहान मुले आणि निराश्रीतांचा समावेश प्रामुख्याने असतो. रेबीजमुळे होणार्‍या मृत्यूत आणि यामुळे आजारी पडून, अपंगत्व येऊन आयुष्यातला बराच मोठा कालावधी वाया घालवाव्या लागलेल्या पीडितांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. शिवाय पीडिताला वेळीच योग्य उपचार मिळाले तरी यामुळे आजारी पडणार्‍यांची संख्या कमी होत नाही कारण कुत्रे इतरांना चावण्याचे थांबत नाहीत. म्हणून संक्रमित कुत्र्यांचे लसीकरण करुनच याच्या प्रसाराला आळा घालता येणे शक्य आहे. अस्तित्वात असलेल्या किमान ७०% कुत्र्यांचे लसीकरण झाले तर त्यांच्यापासून संक्रमित होणारा हा रोग मर्यादेत येऊ शकतो (हर्ड इम्युनिटी). पण भारतात बेवारशी, मोकाट कुत्र्यांची संख्या अधिक - हजारो-लाखोंच्या संख्येने, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे अतिशय अवघड बाब आणि त्यामुळे भारतासारख्या देशात रेबीजचे निर्मूलन ही अशक्यातली बाब समजली जायची. पण गोव्यासारख्या राज्याने, आकाराने लहान का होईना, हे शक्य करुन दाखवले. ते कसे केले त्यावर नुकताच एक संशोधन लेख प्रसिद्ध झाला आहे त्या आधारे लिहिलेली ही यशोगाथा.

याकरता राज्यभर एक मोठा कार्यक्रम २०१३ पासून सातत्याने राबवला गेला आणि त्याचे उत्कृष्ट परिणाम २०१९ नंतर पाहायला मिळत आहेत. हा कार्यक्रम तीन स्तरांवर राबवला गेला - (१) लसीकरण, (२) शिक्षण आणि (३) रेबीज बाधितांवर पाळत. 

(१) लसीकरण

या रोगाला बळी पडणार्‍यांची संख्या आटोक्यात आणायची असेल तर सर्वप्रथम कुत्र्यांचे लसीकरण करणे याला अग्रक्रम देणे आवश्यकच. याकरता राज्यभर वेगवेगळ्या भागांकरता फिरत्या तुकड्यांची पथके तयार केली गेली आणि त्यांच्यावर त्याभागातील मोकाट कुत्र्यांना जाळीत पकडून तसेच पाळीव कुत्र्यांचे लसीकरण करायची जबाबदारी सोपवली गेली. पथकांनी दर दिवशी कुठला भाग पूर्ण करायचा हे स्मार्टफोनवरील नकाशामध्ये बहुभूजकोन (पॉलिगॉन्स) आखून  ठरवले गेले. किती लसी दिल्या गेल्या, त्यातील पाळीव आणि मोकाट कुत्र्यांची संख्या, इत्यादी माहितीचे संकलन मध्यवर्ती केंद्राद्वारे करुन ती माहिती पद्धतशीरपणे साठवली गेली, त्या पथकांना लसीकरणासाठी लागणार्‍या साहित्याचा सातत्याने पुरवठा केला गेला. यामुळे राज्यातला कोपरान-कोपरा पिंजून काढणे शक्य झाले. २०१३ ते २०१७ दरम्यान अंदाजित एक लाख सदतीस हजार कुत्र्यांपैकी सुमारे एक लाख कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले होते आणि तोच वेग पुढची दोन वर्षंही राखला गेला (आकृती १). २०१९ च्या अखेरीस एकूण सव्वाचार लाखांवर लसी देऊन झाल्या होत्या. एका अभ्यासानुसार सुमारे ४०% कुत्र्यांचे लसीकरण झाले तर हे कुत्र्यांमध्ये पसरणार्‍या संसर्गाचे प्रमाण कमी होते तर ७०% लसीकरणाअंती विषाणूंचा प्रसार संपूर्णपणे आटोक्यात येतो. एकूण किती टक्के कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे याचा अंदाज घेण्यासाठी दरवर्षाअखेर प्रत्येक लसीकरण झालेल्या भागात दिसतील तेवढ्या कुत्र्यांची शिरगणती करुन सर्वेक्षण केले गेले. एकूण ३१८८ सर्वेक्षणे झाली त्यातून अखेरीस असे दिसून आले की ९०% कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे. यापैकी ८३% कुत्रे भटक्यांच्या यादीत टाकले गेले. यातील काही पाळलेले जरी असले तरी ते बांधलेले नसून मोकळेच असतात म्हणून त्यांचाही याच यादीत समावेश केला.  



आकृती १: गोव्यातील तालुके आणि त्यातील कुत्र्यांच्या संख्येचा अंदाज

(२) शिक्षण

या कार्यक्रमाचे दुसरे महत्त्वाचे अंग शिक्षणाचे. यामध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित केले गेले. कुत्र्यांपासून कसे सावध राहायचे, आणि जर चावलाच तर काय करायचे हे या कार्यक्रमांतर्गत सांगितले गेले. एकूण सुमारे सात लाख विद्यार्थी आणि ३१ हजार शिक्षकांपर्यंत २०१४ ते २०१९ दरम्यान हा संदेश पोहोचवला गेला. याच दरम्यान विविध समुदायांमार्फत, स्थानिक अधिकारी आणि सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान दीड लाख जनतेपर्यंतही याबाबत संदेश पोहोचवला गेला.

(३) रेबीज बाधितांवर पाळत

कार्यक्रमाला यश मिळवून देणारा तिसरा स्तंभ रेबीज बाधित कुत्र्यांवर पाळत ठेवण्याचा होता. यादरम्यान भटक्या आणि पाळीव कुत्र्यांवर बारीक नजर ठेवली गेली. यासाठी जनतेकडूनही आधार घेतला गेला. कोणाला एखाद्या कुत्र्याविषयी शंका आली तर त्याच्यासाठी ऑक्टोबर २०१७ पासून एका राखीव क्रमांकाच्या फोनवर (हॉटलाईन) संपर्क साधण्याची सोय केली गेली. यावर सात हजारावर आलेल्या संपर्कांची दखल घेतली गेली. दर आठवड्याला २०१८ साली सरासरी ५० जणांनी तर २०१९ मध्ये सरासरी ७९ जणांनी संपर्क साधला. हे संपर्क गोव्याच्या विविध भागातून केले जात होते त्यावरुन या कार्यक्रमाचे यश सर्वदूर पोहोचल्याचे आढळून येते. अर्थात यातील बरेचसे रेबीज बाधित कुत्र्यांसंबंधी नसून सुमारे ४४% संपर्क लसीकरणाची विनंती करणारे होते, ३२% जखमी झालेल्या अथवा आजाराची लक्षणं असलेल्या कुत्र्यांसंबंधी, आणि ७% कुत्र्यांच्या उपद्रवासंबंधी होते. रेबीज बाधित कुत्र्यांसंबंधी संशयाचे संपर्काठिकाणी पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ पोहोचून प्राण्यांचे परीक्षण करत आणि बाधिताच्या संपर्कात आलेल्या लोकांशी संवाद साधत. २०१६ पासून बाधित कुत्र्यांची तपासणी करण्याची सोय स्थानिक स्तरावर उपलब्ध केली असल्याने रोगाचे निदान त्वरीत करण्याची आणि उपचाराला सुरुवात करण्याची सोय झाली होती.

२०१४ साली एकूण ७३ रेबीज बाधित कुत्र्यांची नोंद झाली. त्या वर्षी सरासरी १० प्रतिमहिना (जुलै २०१४ मध्ये सर्वाधिक -२० प्रकरणे) यावरुन हे प्रमाण २०१९ साली ०.८ वर घसरले (९२% घट). २०१९ साली १२ पैकी ११ तालुक्यांमध्ये एकाही बाधित कुत्र्याची नोंद झाली नाही. १२ वा तालुका महाराष्ट्राच्या सीमेवरील असल्याने तिकडून येणारे बाधित सापडले असावेत असा कयास आहे (आकृती २). रेबीज विषाणूंचे पृथःकरण केले तेव्हा त्यांचे तीन प्रकार सापडले. या विषाणूंनी बाधित कुत्रे गोव्याच्या सीमेवरील राज्यातही सापडलेले आहेत. 

आकृती २: २०१४ आणि २०१९ दरम्यान झालेली बाधित कुत्र्यांची नोंद

सार्वजनिक आरोग्य आणि किफायतशीरता 

या कार्यक्रमाच्या परिणामाचा आढावा घेतला तेव्हा असे आढळले की रेबीजमुळे मानवी मृत्यूचे प्रमाण १७ वरुन (२०१४ साली) शून्यावर (२०१८ आणि २०१९ साली) पोहोचले आहे. विशेषतः २०१२ मध्ये कुत्र्याच्या चावण्याच्या प्रकरणांची नोंद दर लाख लोकसंख्येमागे ७८५ (२०१२ साली) वरुन १४३० (२०१९ साली) वर पोहोचली तरीही. 

हा राज्यव्यापी कार्यक्रम याचेच दिग्दर्शन करतो की हा देशभर या मॉडेलप्रमाणे राबवला तर आंतरराष्ट्रीय संस्थांनी सुचवल्याप्रमाणे २०३० पर्यंत भारत त्याचा वाटा हे जग रेबीजमुक्त करण्यासाठी उचलू शकतो. यासाठी प्रत्येक कुत्र्यामागे आलेला सुमारे २७५ रुपयांचा खर्च आंतरराष्ट्रीय सरासरीपेक्षा (१७० रुपये) थोडा जास्त असला तरी इतर काही देशात तो ११७५ रुपयांपर्यंतही पोहोचला आहे. म्हणजे मोकाट कुत्र्यांच्या मोठ्ठया संख्येला पकडून त्यांचे लसीकरण करण्याकरता एवढा खर्च किरकोळच म्हणायला हवा. उत्पादनक्षम व्यक्तीचे आंतरराष्ट्रीय मानकानुसार सरासरी वार्षिक उत्पन्न ४२००० रुपये जर घेतले तर बाधिताचे या कार्यक्रमामुळे वाचलेले आजारपणामुळे वाया गेलेले दिवस किंवा मृत्यू यांचा विचार करता हा कार्यक्रम अतिशय किफायतशीर स्तरावरच राबवला गेला असे म्हणायला हरकत नाही. गोवेकरांचे वार्षिक सरासरी उत्पन्न तर साडेपाच लाख रुपयांपर्यंत जाऊन पोहोचते. भारतीयांचे वार्षिक सरासरी उत्पन्नही दीड लाख रुपये आहे. त्यामुळे हा आलेला खर्च असा कार्यक्रम राबवायला किफायतशीरच आहे असे दिसून येते असे संशोधकांचे मत आहे. या कारणांमुळे गोव्यात राबवलेला हा कार्यक्रम एक पथदर्शक उदाहरणच म्हणायला हरकत नाही.

संदर्भः Gibson, A.D. et al. Elimination of human rabies in Goa, India through an integrated One Health approach. Nature Communications. 13; 2022; 2788. https://doi.org/10.1038/s41467-022-30371-y

आकृती आभार : संदर्भ






शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

तेल-प्रदूषणावर नियंत्रण / Controlling oil-spills

नव्या पध्दतीनं तेल प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याच्या पायऱ्या. चित्र साभार:‌ मूळ लेख
पावसाळा सुरु झाला की समुद्रकिनाऱ्यावर चालणं अवघड होऊन बसतं. अवघड अशासाठी की किनाराभर तेलगोळे पसरलेले असतात आणि त्यातून वाट काढत चालणं बिकट होतं. त्याकडे दुर्लक्ष केलं तर ते आपल्या पादत्राणांच्या तळाशी चिकटून बसतात. कुठून येतात हे तेलगोळे? अर्थातच समुद्रातून. समुद्रातून तेल वाहून आणणारी जहा़जं त्यांच्या टाक्या रिकाम्या झाल्यावर परतीचा प्रवास करता करता समुद्राच्या पाण्याचे उष्ण फवारे वापरुन जहाजाचे डेक धुण्याचे 'रिकामपणचे उद्योग' करतात. मग ते तेल पाण्यात मिसळतं, पाण्याबरोबर घुसळलं जातं आणि त्याचे तेलगोळे तयार होत समुद्रतळाशी जाऊन बसतात. पावसाळ्यापूर्वी जेव्हा वेगानं वारे वाहायला लागतात, समुद्र खवळतो तेव्हा पाण्याच्या अभिसरणातून ते गोळे पाण्याबाहेर किनाऱ्यावर फेकले जातात. तेलप्रदूषणाविरुध्द (तेलामुळे होणारं पाण्याचं प्रदूषण) कायदे आहेत पण त्याची कडक अंमलबजावणी करायला आपल्याकडे आवश्यक ती साधनसामग्री आणि पुरेसं मनुष्यबळ याची कमतरता हे नेहमीचंच रडगाणं आहे.

तसं पाहिलं तर सगळा हिंद महासागर, विशेषतः अरबी समुद्र कायमच तेलप्रदूषणामुळे ग्रस्त आहे. कारण तेल वाहून नेणारी अजस्त्र जहाजं अरब देशांतून जगभरच्या इतर देशांना तेल पोहोचवण्याकरता इथूनच प्रवास करतात. त्यांच्या इतर जहाजांशी होणाऱ्या टकरांतून ती फुटणं आणि मग नको तितकी तेलगळती ही कायमची डोकेदुखी आहे. २८ जानेवारी २०१७ ला चेन्नैजवळच्या एन्नोर बंदरातला अपघात हे ताजे उदाहरण. बीडब्ल्यू मेपल नांवाच्या ४७३ टनी ब्रिटीश तेलवाहू जहाजाने डॉन कांचीपूरम नांवाच्या भारतीय जहाजाला टक्कर दिल्यानंतर किमान ३० ते ६० टन तेल समुद्रात सांडलं. अपघातांशिवाय समुद्रातल्या तेलविहिरीतून तेल काढताना, जलक्रिडेनिमित्तानं वाढ झालेल्या स्वयंचलित बोटी वगैरे तेलप्रदूषणाची इतरही काही कारणं आहेत.

या प्रदूषणाचा सर्वात मोठा फटका समुद्रपक्ष्यांना बसतो. ते पाण्यावर भक्ष्याच्या शोधात उतरतात तेव्हा त्यांच्या पंखांना हे सांडलेलं तेल चिकटून बसतं. पंख जड होतात आणि त्यांना हवेत भराऱ्या घेणं अशक्य होऊन बसतं. तसेच जलचरांच्या श्वास घेण्याच्या यंत्रणेलाच यामुळे धोका पोहोचतो. सी-ऑटर्सची संपूर्ण त्वचाच श्वसनासाठी वापरली जाते त्यावर तेलाचा थर जमा होतो तर व्हेल माशांची नाकं यामुळे बुजतात. याशिवाय ते जी मासळी खातात तीही प्रदूषित होते  आणि अन्नसाखळीतील सगळ्यांनाच ते सेवन केल्यावर बाधा पोहोचण्याची शक्यता असते. यात समुद्र खाद्यावर जगणारा मानवही आला. समुद्री वनस्पतींवर तेल तवंग चढल्यामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते, बंद पडते. एकपेशीय प्राणी, माशांच्या जीवनचक्रातील सुरुवातीच्या अळ्या, शिंपले, तिसरे, शिणाणे (ऑयस्टर्स) वगैरे सगळेच या प्रदूषणामुळे ग्रस्त होतात.

अपघाताने समुद्राच्या पाण्यावर निर्माण झालेल्या तेल तवंगांचं निर्मूलन ही एक मोठीच डोकेदुखी होऊन बसली आहे. सध्या अशा तेल तवंगांचं निर्मूलन प्रथम जिथं ते पसरलं आहे त्या पाण्यावर 'कुंपण' घालून केलं जातं. तेल पाण्यावर तरंगतं. पण लाटांमुळे, अभिसरणामुळे ते इतरत्र पसरण्याची भीतीही मोठ्या प्रमाणात असते. मग पाण्यावर असं तरंगतं कुंपण घालून त्याच्या पसरण्याला प्रथम आळा घातला जातो. त्यानंतर आहे त्या ठिकाणीच ते जाळून नष्ट करता येतं पण त्यातही पर्यावरणाला आणि जलचरांना हानी पोहोचण्याची मोठी शक्यता असते. शिवाय वायू प्रदूषण होतं ते वेगळंच. दुसरा प्रकार म्हणजे रासायनिक क्रियांद्वारा या तेलाचं विघटन करणं. पण मग ते आणखी नव्या प्रश्नांना जन्म देतं. सांडलेल्या तेलावर ते विघटन करणारे जीवाणू सोडायचे हा आणखी एक उत्तम नैसर्गिक पर्याय. पण त्यालाही मर्यादा आहेत. थोड्या प्रमाणात तेल सांडलं असेल तर ते जीवाणू सोडून परिणामकारकपणे नियंत्रित करणे शक्य आहे पण मोठ्या प्रमाणात झालेल्या तेल प्रदूषणाला अशा प्रकारे आळा घालणे अशक्य होऊन बसतं. अन्य साधनसामग्री वापरुन सध्या असं प्रदूषण आटोक्यात आणलं जातं. सांडलेल्या तेलावर कुंपण घातलं की मग वरचा तेल तवंग खेचून घेण्याची यंत्रसामग्री निर्माण केली गेली आहे. सांडलेलं तेल स्पंजासारख्या गुणधर्म असणाऱ्या वस्तू वापरुन त्याद्वारे ते शोषून घेणं हाही आणखी एक पर्याय.

तेल आळवणारा पदार्थ वापरता आला तर? असे पदार्थ अस्तित्वात आहेत. त्यांना जिलेटर्स म्हणतात. ते सांडलेल्या तेलाला बांधून घेतात पण त्यांच्या ठिसूळतेमुळे आणि बुळबुळीतपणामुळे त्यांना हाताळणं अवघड असतं. तिरुअनंतपुरमच्या 'आयसर' संस्थेतल्या वैज्ञानिकांनी या दृष्टिनं विचार करुन जिलेटरच्या दोषांवर पांघरुण घालणारा पर्यावरण स्नेही, कमी खर्चिक आणि कमी घनतेचा, सच्छिद्र असा पदार्थ कोणता याचा शोध घेतला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं (Prathap, A.; Sureshan, K.M. Organogelator – Cellulose Composite for Practical and Eco-friendly Marine Oil Spill Recovery. Angewandte Chemie 56(32); 2017; 9405–9409). याकरता त्यांनी सेल्युलोजचा लगदा जिलेटरबरोबर मिसळून तो गोळ्यांच्या स्वरुपात तयार केला. असा लगदा करायला स्वस्त असा कच्चा माल म्हणून निलगिरी, बाभूळ वगैरेची खोडं वापरता येणं शक्य आहे. भारतात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. लगदा करायची पध्दत कागद तयार करण्याच्या कारखान्यात वापरली जाते तशीच. या झाडांचे तंतू बऱ्यापैकी लांब असतात आणि ते जिलेटरला व्यवस्थित 'बांधायला' उपयोगी असल्याचं दिसून आलं. खरं म्हणजे लगदा स्पंजासारखं काम करत असल्यानं जिलेटरची आवश्यकताच काय असा प्रश्न वैज्ञानिकांच्या मनातही आला. पण फक्त अशा लगद्याचाच वापर केला तर तो जलस्नेही असल्यानं तेलाबरोबर पाणीही (तेलापेक्षा पाणीच जास्त) खेचून घेतो आणि त्याचे गोळे पाण्यात बुडतात असं त्यांना आढळून आलं. तर जिलेटर जलरोधी असल्यानं तो पाणी न शोषता तेलच शोषतो आणि ही जोडगोळी पाण्यावर तरंगते जी सहज गोळा करणं सोपं जातं. लगदा, त्याच्या लांब तंतूंमुळे, शोषून घेतलेल्या तेलाला आपल्यात सामावून तर घेतोच पण गोळ्याचं स्वरुप टिकवून ठेवण्याचं कामही करतो आणि त्यामुळे त्याला पाण्यातून सहज वर काढणं सोपं जातं. एकदा का तेल शोषलेले गोळे पाण्याबाहेर काढले की पाणी पुन्हा शुध्द स्वरुपात आपल्याला मिळू शकतं.

पाण्यावरचा तेल तवंग
पाण्यावरचा तेल तवंग शोषून घेतल्यावर 
या वैज्ञानिकांनी प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगात असं दिसून आलं की वेगवेगळा चिकटपणा असलेला हा तेल तवंग सुमारे ३० ते १२० मिनिटात ही जोडगोळी शोषून घेते. सुमारे ८०० मिलीग्राम वजनाची जोडगोळी १५ मिली लिटर तेल शोषून घेऊ शकते जे त्यातील जिलेटरच्या वस्तुमानाच्या २६० पट तर जोडगोळीच्या वस्तूमानाच्या १६ पट आहे. हे आकडे पाहिले की टनावारी सांडलेले तेल पाण्यातून काढायला किती टन सेल्युलोज लागेल याची कल्पना करवत नाही आणि एवढे सेल्युलोज कुठून आणायचे हा प्रश्न उभा राहातो. पण इतर उपायातून आणखी स्वस्तात आणि या प्रमाणात प्रदूषण नियंत्रण करण्याचं तंत्रज्ञान तरी कुठे उपलब्ध आहे? म्हणून या प्रयोगाचं महत्त्व वाढतं आणि म्हणूनच मर्यादित खर्चात, कमीत कमी देशात उपलब्ध असलेला कच्चा माल वापरुन जास्तीत जास्त सांडलेलं तेल गोळा करायला हा उत्तम पर्याय ठरु शकतो. तेल शोषून घेतलेल्या गोळ्यांवर दाब दिला की, किंवा उर्ध्वपातन पध्दतीनं त्यातले तेलही पुनर्वापरासाठी मिळू शकतं असंही लक्षात आलं आहे शिवाय या प्रयोगात झाडांपासून काढलेले सेल्युलोज जरी वापरलेले असले तरी कागदाचा पुनर्वापर करुन लगदा बनवण्याचे प्रयोग करणेही आवश्यक आहे.

तेल तवंग काढून घेण्याच्या सध्या काही पध्दती तरी सुरुवातीला वर्णन केल्याप्रमाणे अस्तित्वात आहेत. पण जेव्हा हे तेल पाण्यात सांडतं तेव्हा पाण्याच्या सतत घुसळण्याच्या क्रियेमुळे कालांतरानं त्याचं (तेल-पाण्याचं) एक मिश्रण (पायस) तयार होतं. यातून तर तेल वेगळं करणं केवळ अशक्य आहे. पण या जोडगोळ्यांद्वारे त्यातील तेलही वेगळं करणं सहज शक्य आहे असंही प्रयोगाअंती आढळून आलं आहे. हंस पक्ष्याला 'नीरक्षीर विवेक' बुध्दी असते असं म्हणतात. पाणी आणि दूध एकत्र असेल तर त्यातलं केवळ दूधच पिणारा पक्षी ही कविकल्पना आहे की माहिती नाही पण जिलेटर आणि लगद्याचं मिश्रण पाण्यात सांडलेलं तेल वेगळं करायला मात्र मिळालं आहे. हे तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर येऊन तेलामुळे प्रदूषण झालेल्या समुद्राच्या पाण्यात लवकरात लवकर वापरलं जावं ही सदिच्छा.

हा लेख गोवन वार्ता या दैनिकाच्या २७ ऑगस्ट २०१७ आणि 'शैक्षणिक संदर्भ' च्या ऑकटोबर-नोव्हेंबर २०१७ (अंक १०८) अंकात प्रसिद्ध झाला.